मुकेश अंबानी, गौतम अदानी, कुमार मंगलम बिर्ला यांसारख्या १० उद्योगपतींच्या उपस्थितीत रामंमंदीर भूमिपूजन
नवी दिल्ली
आयोध्या मंदीर भूमिपूजन प्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याचे निमंत्रण नसल्याने वाद निर्माण झाला होता. पण केवळ एकाच मुख्यमंत्र्यांना या भुमिपुजन सोहळ्याचे निमंत्रण गेल्याचे स्पष्ट झाले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशिवाय इतर कोणत्याही मुख्यमंत्र्यांना याचे निमंत्रण दिले जाणार नाही. विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी यासंदर्भातील माहिती दिली. अयोध्येत ५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राम मंदिर भुमिपुजनाच्या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त अनेक प्रसिद्ध व्यक्ती हजेरी लावणार आहेत. यामध्ये रतन टाटा, मुकेश अंबानी, गौतम अदानी, कुमार मंगलम बिर्ला, आनंद महिंद्रा, राहुल बजाज, राजीव बजाज यांसारख्या १० उद्योगपतींच्या नावांचाही समावेश आहे. भूमिपूजन कार्यक्रमात जवळपास २०० पाहुणे सहभागी होतील. यामध्ये ५० साधू-संत, ५० अधिकारी आणि ५० जण विश्व हिंदू परिषद (VHP) आणि न्यासाशी संबंधित असतील, शिवाय देशातील ५० नेत्यांचाही समावेश असेल.
ई-भूमिपुजनाच्या मुद्यावरून विहीपने केला उद्धव ठाकरेंचा निषेध
अयोध्येतील राम मंदिराला लढ्याची पार्श्वभूमी आहे. हा जागतिक कुतूहलचा विषयही आहे. रामभक्त अनेक वर्षांपासून या क्षणाची वाट पाहत आहेत, मात्र कोरोनामुळे आपण नागरिकांना मंदिरात जाण्यास बंदी घातली आहे. मग आता तुम्हीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेही भूमिपूजन करू शकता, ई-भूमिपूजनही करू शकता, असेही उद्धव ठाकरे यांनी सुचवले. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली होती. त्यात राऊत यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या मुद्द्याला हात घालत मुख्यमंत्री ठाकरे यांना प्रश्न केले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी परखड मत व्यक्त केले. राम मंदिराच्या भूमिपूजनाला जाणार की नाही? एक व्यक्ती म्हणून हो की नाही, हे मी काहीही सांगेल. मी मुख्यमंत्री आहे, पूर्ण सुरक्षेत मी व्यवस्थित जाऊन येईलही. मुद्दा तो नाही.सर्वसामान्य भक्तांचे काय असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
राम जन्मभूमीचे 'ई-भूमीपूजन' करण्यात यावे या ठाकरे यांच्या वक्तव्यावरून विश्व हिंदू परिषदेने ठाकरेंचा निषेध केला आहे. ठाकरेंचे हे वक्तव्य म्हणजे एकेकाळी 'हिंदुत्ववादी' असणारा पक्ष संपत चालल्याचे लक्षण असल्याचे मत विहीपचे कार्यकारी अध्यक्ष अलोक कुमार यांनी व्यक्त केले आहे. उद्धव ठाकरे हे अंधपणे या गोष्टीला विरोध करत आहेत. कोणतेही बांधकाम सुरू करण्यापूर्वी बांधकाम चांगले होईल यासाठी पुजा करण्यात येते. अशाप्रकारची पूजा ही ऑनलाईन होऊ शकत नाही, भूमीपूजनाला २०० लोक राहतील उपस्थित राहतील अशी दक्षता आम्ही घेऊ, असे कुमार यांनी स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने प्रतिकात्मक रथ यात्रेसाठी परवानगी दिली होती. तसेच, अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली असली तरी पूजेचे सर्व विधी पार पडणारच आहेत. त्यामुळे राम मंदिराचे भूमीपूजन करण्यालाही कोणाची काही हरकत नसावी. विहीप ही पहिल्यापासून यासाठी खबरदारी बाळगत आहे असे कुमार म्हणाले.
0 टिप्पण्या