Top Post Ad

खोदकामात जे सापडले ते बौद्ध अवशेष आहे हे मान्य करायला हवे होते- बाळासाहेब आंबेडकर

खोदकामात जे सापडले ते बौद्ध अवशेष आहे हे अलाहाबाद न्यायालयाने हे मान्य करायला हवे होते- बाळासाहेब आंबेडकर





अयोध्या निकाल तथ्यावर नव्हे तर भावनांवर देण्यात आल्याची टीका बहुजन वचिंत आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलीय. पुरावे आणि इतिहासाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर अयोध्या हे बौद्धांचे सांस्कृतिक शहर होते. वैदिक धर्म मानणारे लोक हे दुसऱ्या धर्मावर अतिक्रमण करीत असल्याचा प्रकार आयोध्येत होत आहे.  अयोध्या ही बौद्ध सांस्कृतिक तसेच बौद्धांचे ज्ञानाचे केंद्र होते. अलाहाबाद म्हणजे प्रयागराज उच्च न्यायालयात प्रकरण गेले तेव्हा हा निकाल तथ्यांवर नाही तर भावनांवर म्हणजे राम मंदिराच्या बाजूने लागला  सर्वोच्च न्यायालयातही इतिहास आणि पुराव्यांना ग्राहय धरले नसल्याचे ते म्हणाले. अयोध्या ही पूर्वी साकेत नावाने ओळखली जात होती. या ठिकाणी केलेल्या खोदकामात जे सापडले ते बौद्ध अवशेष आहे हे अलाहाबाद न्यायालयाने हे मान्य करायला हवे होते. मात्र तसे घडले नाही. सद्य परिस्थिती पाहता राम मंदिर निर्माण करण्याची गरज असून आम्ही राम मंदिराच्या बाजूने निकाल देतो, असे स्पष्ट न्यायालयाने सांगायला हवे होते. असे झाले असते तर भारतीयांकडे कोणी संशयित नजरेने पाहीले नसते असे बाळासाहेब आंबेडकर म्हणाले.





 


आयोध्येत बुध्दविहार साकारण्यासाठी सर्व आंबेडकरी नेत्यांनी एकत्र यावे - महागायक आनंद शिंदे 
आयोध्येतील प्राचीन अवशेष सम्राट अशोक काळातीलच
सांगोला / दादाश्री मागाडे
राम मंदिराच्या उभारणीसाठी जमिनीचे सपाटीकरण करताना आढळून आलेल्या प्राचीन मूर्ती व अवशेषांवरून ही बुद्धभूमी असल्याचे स्पष्ट होते.  जमीन सपाटीकरणात जे प्राचीन अवशेष सापडले ते सम्राट अशोकाच्या शासन काळातील आहेत. काही लोकांनी रामजन्मभूमी परिसराचे निष्पक्ष उत्खनन करण्यात यावे, अशी मागणी यूनेस्को या जागतिक पातळीवरील संघटनेकडे केली आहे. देशातील अनेक बडे आंबेडकरी नेते हे वेगवेगळ्या पक्ष,संघटना यामध्ये विभागले आहेत परंतू अशा वेळी सर्व आंबेडकरी नेत्यांनी एकत्र येऊन आयोध्येत सर्वात मोठे बुध्दविहार व बौध्दअवशेष,मुर्त्यांचे जतन करण्यासाठी संग्राहलय उभे करावे अशी प्रमूख मागणी घेऊन सर्व आंबेडकरी नेत्यांनी, भिमबांधवांनी व्यापक लढा उभा करुन आपला अधिकार मिळवला पाहीजे. आयोध्येत बुध्दविहार निर्माण व्हावे यासाठी देशातील सर्व आंबेडकरी नेत्यांनी एकत्र होऊन लढा देणे गरजेचे असल्याचे आवाहन राष्ट्रीय महागायक आनंद शिंदे यांनी केले आहे. 



अयोध्येत सापडलेले प्राचीन अवशेष बौद्ध धम्माशी संबंधित असल्याचा दावा ऑल इंडिया मिल्ली काऊन्सिलचे सरचिटणीस कालिक अहमदखान यांनी सुद्धा केला आहे. अयोध्येतील विनीत कुमार मौर्य यांनी २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करून वादग्रस्त स्थळाखाली अनेक अवशेष गाडले गेलेले आहेत, ते सम्राट अशोक काळातील आहेत आणि त्याचा संबंध बौद्ध धम्माशी आहे. बाबरी मशिदीच्या बांधकामाच्या आधी वादग्रस्त जागेवर बौद्ध विहार होते, असा दावा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून केला होता.
भारतीय पुरातत्व खात्याने केलेल्या उत्खननात रामजन्मभूमीच्या ठिकाणी स्तूप, गोलाकार घुमट, भींती आणि खांब आढळून आले आहेत. बुद्ध विहाराची ती वैशिष्ट्ये असतात. ज्या ५० खड्ड्यांत उत्खनन करण्यात आले तेथे कोणत्याही मंदिर किंवा हिंदू बांधकामाचे अवशेष आढळले नाहीत, असा दावाही मौर्य यांनी या याचिकेत केला होता. हा दावा पुन्हा एकदा खरा ठरला आहे. कारण राममंदिर उभारणीसाठी काही दिवसांपूर्वीच जमीन सपाटीकरण करताना पुन्हा बौद्ध धर्माचे सम्राट अशोकाच्या काळातील व त्यापूर्वीचेही अवशेष सापडले आहेत.


• अयोध्या नव्हे साकेत नगरी
 अयोध्येतील अवशेषांवरून आता वेगवेगळे दावेही केले जात आहेत. आजची अयोध्याही बौद्धांची प्राचीन साकेत नगरी आहे. गुप्त काळात साकेत नगरीचे नाव बदलून अयोध्या ठेवण्यात आले. त्यापूर्वी भारतात कुठेही अयोध्या नव्हती, असा दावा ज्येष्ठ विचारवंत दिलीप मंडल यांनी केला आहे.


वस्तुस्थिती
१. अयोध्येत सापडलेले चक्र आणि बौद्ध स्तुपांवरील धम्मचक्र याच्यात अद्भूत साम्य आहे.
२. कोलकात्यातील इंडियन म्युझियममध्ये असलेले भरहुतमध्ये सापडलेले धम्मचक्र आणि अयोध्येत सपाटीकरणात सापडलेले धम्मचक्र सारखेच आहे.
३. २९ आरे असलेले धम्मचक्र बौद्ध धम्माशिवाय अन्य कोणत्याही धार्मिकस्थळावर आढळून येत नाही. अयोध्येत सापडलेले धम्मचक्र २९ आरे असलेलेच आहे.
४. अयोध्या मंदिर परिसरात सपाटीकरणात जी शिल्पे सापडली आहेत, त्याला बौद्ध धम्मात पद्म- पदक म्हणतात.
५. अयोध्येत सापडलेल्या ज्या अष्टकोनी कलाकृतीला शिवलिंग असल्याचे सांगण्यात येत आहे, वस्तुतः ते मनौती स्तूप आहे.
६. अयोध्येच्या चारही बाजूला बौद्धस्थळे आहेत. श्रावस्ती, कपिलवस्तू, कुशीनगर, कौशांबी, सनकिसा आणि सारनाथ. चीनी प्रवाशी फाइयानलाही अयोध्येत शंभरहून अधिक बौद्ध विहारे आढळली होती. आता खोदकामात त्याचेच अवशेष सापडत आहेत.


सपाटीकरणात सापडलेले अवशेष हे मंदिराचे अवशेष आणि तुटलेल्या मूर्त्या असल्याचा दावा राम मंदिर ट्रस्टने केला असला तरी या मूर्त्या मंदिराचे अवशेष नसल्याचे मुस्लिम पक्षकारांचे म्हणणे आहे. १३ व्या शतकात तेथे कोणते मंदिर होते हे भारतीय पुरातत्व खात्याने सादर केलेल्या पुराव्यांवरून सिद्ध होत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मूर्त्या आणि मंदिराचे अवशेष सापडले हा एक प्रपोगंडा आहे, असे अयोध्या वादातील सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील जफरयाब जिलानी यांनी म्हटले आहे.


• आंबेडकरी नेत्यांनी पक्ष बाजूला ठेवून एक व्हावे
महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीला मोठा इतिहास आहे. दलित पँथरचे नाव ऐकताच जातीयवादी व्यवस्थेला घाम फुटत होता. मोर्चे, आंदोलने कशी करावीत, अत्याचाराचा विरोध कसा करावा, न्याय पदरात कसा पाडून घ्यावा यांचा वस्तुपाठ आंबेडकरी चळवळीने इतर समाजाला घालून दिला आहे. राज्यातील सर्वच पक्षांत आंबेडकरी विचारधारेचे आमदार व नेते आहेत. केंद्रात सामाजिक न्याय राज्यमंत्री असलेले रामदास आठवले, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे, रिपब्लिकन पक्षाचे गवई गटाचे नेते राजेंद्र गवई तसेच रिपाइंचे सर्व गटाचे नेते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांना मानणा-या सर्वच नेत्यांनी अयोध्येत बुद्धविहार साकारण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. 


• राममंदिराच्या जागेवर नैसर्गिकदृष्ट्या पहिला हक्क बौद्धांचा
अयोध्येतील राम मंदिरप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा आम्ही मान राखतो. बाबरी मशिदीच्या जागेवर बाबरी मशीद की, राममंदिर या वादात बौद्ध बांधव पडले नाहीत. त्यामुळेच बौद्ध विहाराची मागणी मागे पडली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. काहीजणांनी अयोध्येतील बौद्ध अवशेषांच्या आधारे न्यायालयात याचिका दाखल केली असली तरी लोकांचा रेटा कमी पडत आहे. त्यासाठी लोकरेटा निर्माण होण्यासाठी महाराष्ट्र व देशातील सर्वच आंबेडकरी नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. 


• .. अन्यथा पुढची पिढी तुम्हाला माफ करणार नाही
"जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही", असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते. बाबासाहेबांच्या या विधानानुसार वागण्याची आता नितांत गरज आहे. इतिहास किंवा सांस्कृतिक, प्राचिन वारसा हा पुढच्या कैक पिढ्यांना प्रेरणा देत असतो. असे असताना अयोध्येतील बौद्ध अवशेषांच्या जपणुकीची, बौद्ध विहार उभारणीची नितांत गरज आहे. हे आपल्या हातून न झाल्यास पुढची पिढी माफ करणार नाही, हे आंबेडकरी नेत्यांनी ध्यानात घ्यावे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com