पेण पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यानी अरेरावी
माजी आमदाराच्या घराचे नळ कनेक्शन तोडण्याचे आदेश
पेण
कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळविण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉक डाऊन केलेले असताना पेण पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यानी अरेरावी करीत उंबर्डे गावातील विजय लक्ष्मण म्हात्रे यांना घरपट्टी, पाणीपट्टी भरल्याची पावती दाखविली नाहीतर तुमचे नळ कनेक्शन तोडले जाईल असा धमकीवजा इशारा त्यांच्या घरात जाऊन दिला आहे.
पेण विधानसभा मतदार क्षेत्राचे माजी आमदार श्री. लक्ष्मण तथा बाळासाहेब शंकर म्हात्रे यांचे चिरंजीव विजय म्हात्रे यांनी बुधवार दि.२५ मार्च रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद अलिबाग व जिल्हाधिकारी रायगड यांचेकडे पेण तालुक्यातील हेटवणे पाणी पुरवठा योजनेचे पाणी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव असेपर्यंत उबंर्डे गावासाठी दोन दिवसा ऐवजी एक दिवसाआड सोडण्यात यावे, अशा आशयाची विनंती पत्र ईमेल पत्राच्या माध्यमातून केली होती.
जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार पेण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजताच उंबर्डे गावात हजेरी लावली. विजय म्हात्रे यांच्याकडे तक्रारी बाबत रितसर चौकशी केली नाही उलट त्यांचेकडून त्यांचे घराची घरपट्टी व पाणीपट्टी भरल्याच्या पावत्याची मागणी केली. सदरच्या पावत्या पेण येथील घरी आहेत. सर्वत्र संचारबंदीचे आदेश असल्याने आताच देणे शक्य नाही. तुम्हाला पाहायच्याच असतील तर उद्या आणून दाखवितो असे सौज्यन्य पूर्वक सांगितले . पण हट्टाला पेटलेल्या अधिकाऱ्यानी त्यांची विनंती धुडकावून लावली. पेण येथील पाणी पुरवठा अधिकाऱ्याला फोनवरूनच नळ कनेकशन खंडित करण्याच्या कारवाईचे आदेश दिले.
देशभररात कोरोना व्हायरसाच्या थैमानामूळे जनमानसांचे जीवानमान विस्कळीत झाले आहे. देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, जिल्हाधिऱ्यांकडून नागरिकांनी घरातच राहावे. सेनिटायझर, जास्तीत पाण्याचा वापर करुन आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन केलेले असताना पेण पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांनी एका माजी आमदारांच्या कुंटुबाचे पाण्याचे नळ कनेक्शन तोडण्यासाठी चालविलेला खटाटोप हे सारेच अनाकलनीय आहे.
दरम्यान विजय म्हात्रे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद यांना पेण पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांच्या मनमानी बाबत ईमेल पत्राद्वारे तक्रार केली. या अधिकाऱ्यांनी आकसाने माझे घराचे नळ कनेक्शन तोडण्याचे वक्तव्य केल्याने कुटुंबातील माणसांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सामाजिक परिस्थितीचे भान नसलेल्या अधिकाऱ्याच्या विरोधात कठोर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे.
0 टिप्पण्या