भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तरीनिमित्त ‘आंबेडकरी स्त्री संघटन’तर्फे ‘जागर संविधान संस्कृतीचा हा संविधान महोत्सव व जागृती परिषद दादर (पूर्व) येथील आंबेडकर भवन येथे २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायं.६ पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. संविधान मूल्यांची जनजागृती आणि सामाजिक समता या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.या परिषदेचे उद्घघाटन सुप्रसिद्ध अभिनेता व कवी डॉ. मिलिंद शिंदे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्ष म्हणून नामवंत लेखिका, कवयित्री व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. प्रज्ञा दया पवार मार्गदर्शन करतील. परिषदेच्या समारोप प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून लेखक व सामाजिक विचारवंत प्रा. डॉ. राम पुनियानी भाष्य करतील.
कार्यक्रमात उद्घाटन सत्रानंतर मध्यान्ह सत्र, संविधानमूल्यांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम तसेच टॉक शोचे आयोजन करण्यात आले. विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर सुनील खोब्रागडे, राही भिडे, चयनीका शाह, डॉ. कुंदा प्र. नि., हसीना खान या परिषदेतील सत्रांना मार्गदर्शन करणार आहेत.हा उपक्रम ‘आंबेडकरी स्त्री संघटना’च्या संस्थापिका प्रा. आशालता कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नंदा कांबळे, पुष्पा धाकतोडे, शिरीन लोखंडे, डॉ. प्रज्ञा दया पवार, छाया खोब्रागडे , डॉ निशा शेंडे ,श्यामल गरुड, शारदा नवले, छाया कोरेगावकर, माधुरी शिंदे, सुरेखा पैठणे, वैभवी अडसूळ व मयुरा सावी या परिश्रम घेत आहेत. अशा प्रकारचा हा साहित्यिक कार्यक्रम मुंबई दादर येथे प्रथमच घेण्यात येणार असून या कार्यक्रमात रसिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सुकाणू समितीने केले आहे.देशाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस असलेल्या २५ नोव्हेंबरची पुन्हा एकदा आठवण करून देत वंचित बहुजन आघाडीने “संविधान सम्मान महासभा” आयोजित करण्याची घोषणा केली आहे. २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले शेवटचे भाषण भारतीय लोकशाहीचे मार्गदर्शक तत्त्व आहे. या भाषणात त्यांनी राष्ट्रापेक्षा धर्माला प्राधान्य देण्याच्या धोक्यांबाबत इशारा देत समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित सामाजिक लोकशाहीची आवश्यकता स्पष्ट केली होती.या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधत मंगळवार, २५ नोव्हेंबर २०२५ रोजी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने संविधानाच्या गौरवार्थ “संविधान सम्मान महासभा” आयोजित करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दादर, मुंबई येथे संध्याकाळी 4. वा. या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या महासभेत सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता, लोकशाही मूल्ये आणि संविधान संरक्षणाच्या मुद्द्यांवर चर्चा व मार्गदर्शन होणार आहे.वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी संविधानप्रेमी नागरिक, फुले–शाहू–आंबेडकर विचारवंत, मानवतावादी आणि सर्व लोकशाहीवादी जनतेला या महासभेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.देशभरातील मान्यवर या संविधान सम्मान महासभेला उपस्थित राहणार आहेत.

0 टिप्पण्या