जगातील सर्वात मोठा विनामूल्य वृध्दाश्रम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजकोट येथील "सदभावना वृध्दाश्रम"तर्फे पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम राष्ट्रीय स्तरावर राबवला जाईल. या उपक्रमाअंतर्गत संपूर्ण भारतभर १५१ कोटी झाडे लावण्याचा आणि त्यांचे संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यातील सुरुवातीच्या टप्प्यात तीन कोटी झाडे महाराष्ट्रात लावण्यात येणार आहेत. तसेच ४०० कोटी रुपये खर्चून विश्वातील सर्वात मोठा विनामूल्य वृध्दाश्रम कॉम्प्लेक्स उभारण्याची ऐतिहासिक घोषणा संस्थेचे संस्थापक, 'ग्रीन मॅन' म्हणून प्रसिद्ध असलेले विजय दोबारिया, संस्थेचे सल्लागार मितल खेतानी यांनी केली. या उपक्रमाला आध्यात्मिक आणि सामाजिक पाठिंबा देण्यासाठी पूज्य संत मोरारी बापूंची ‘मनस वंदे मातरम्’ रामकथा आचार्य अत्रे मैदान, घाटकोपार येथे शनिवार, २२ नोव्हेंबर ते रविवार, ३० नोव्हेंबर दरम्यान आयोजित केली आहे. कथा दररोज सकाळी १० वाजता सुरू होईल. महाराष्ट्र विधानसभेचे आमदार परागभाई किशोरभाई शाह आणि त्यांचा परिवार या कार्यक्रमाचे मनोरथी (मुख्य यजमान) आहेत. आज मुंबई मराठी पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेकरिता विजय दोबारिया, मितल खेतानी यांच्यासह हसु भाई नागरेचा, श्रीमती उर्मीबेन राडिया, धिरेन्द्र कनाबार ,गोविंद भानुशाली, जयेश जरीवाला आदी उपस्थित होते.
विजय दोबारिया म्हणाले,"गेल्या दहा वर्षांत आम्ही १.१० कोटी झाडे लावून त्यांचे संवर्धन केले आहे. आता भारतभर १५१ कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. गुजरातमध्येच १५० मियावाकी जंगलांची निर्मिती करण्याचा आमचा मानस आहे." तर संस्थेने आजवर ४० लाखांपेक्षा जास्त देशी प्रजातींची नीम, पिंपळ, वड, आवळा, उंबर ची झाडे मोठ्या प्रमाणात वाढवली आहेत. झाडांचे संवर्धन हीच खरी जबाबदारी असल्याचे सल्लागार मितल खेतानी यांनी स्पष्ट केले.राजकोट-जामनगर रोडवरील रामपर येथे सात ११-मजली इमारतींचा विश्वातील सर्वात मोठा विनामूल्य वृध्दाश्रम कॉम्प्लेक्स उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे ४०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, आधुनिक सुविधांनी युक्त हा कॉम्प्लेक्स १५ एकर जागेवर उभारला जाणार आहे. या विशाल कॉम्प्लेक्समध्ये ७ अत्याधुनिक ११- मजली टॉवर्स,प्रत्येक टॉवरमध्ये १०० खोल्या मोठे टेरेसेस व व्हीलचेअर-अॅक्सेसेबल इमारत, अन्नपूर्णा भोजनालय,वाचनालय, योग हॉल, व्यायामशाळा,वैद्यकीय केंद्र, बाग, कम्युनिटी हॉल बेड-रिडन आणि विशेष काळजी आवश्यक असलेल्या ज्येष्ठांसाठी २४x७ केअर-टेकर टीमची उपलब्धता अशा या प्रकल्पामुळे भारतातील ५००० निराधार, एकाकी, अपंग, मानसिकरित्या आजारी, दृष्टीहीन आणि बेड-रिडन ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यभर मोफत निवास, आरोग्यसेवा, प्रेम आणि सन्मान मिळणार आहे. लंडन येथील विनुभाई बछुभाई नागरेचा यांनी नूतन प्रकल्पासाठी १०८ कोटींचे दान दिले आहे. सध्या संस्थेकडे १४०० खोल्यांमध्ये ५००० बेड-रिडन आणि निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा असून हे जगातील सर्वात मोठे वृध्दाश्रम मानले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
राजकोट येथे स्थित, ‘वन पंडित’ विजयभाई दोबारिया यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेला सद्भावना वृध्दाश्रम हा जगातील सर्वात मोठा, पूर्णपणे विनामूल्य सेवा देणारा वृध्दाश्रम आहे. मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट मागील दहा वर्षांपासून हा उपक्रम चालवत आहे. येथे ७०० पेक्षा अधिक निराधार आणि आजारी ज्येष्ठांचा सांभाळ केला जातो; त्यापैकी ३०० ज्येष्ठ बेड-रिडन आहेत आणि सततच्या देखभालीची गरज असते. वृध्दाश्रमाशिवाय संस्था वृक्षारोपण, बदद आश्रम (जखमी आणि परित्यक्त बैलांसाठी), डॉग शेल्टर, प्राणी रुग्णालय आणि मोफत वैद्यकीय सेवा अशा अनेक समाजोपयोगी कामांत सक्रिय आहे. संस्थेने आजपर्यंत ४० लाखांहून अधिक देशी प्रजातींची झाडे जसे की नीम, पिंपळ, वड, उंबर, आवळा इ. लावली आणि वाढवली आहेत. नवीन कॉम्प्लेक्समध्ये ७ टॉवर्स, प्रत्येकात १०० खोल्या, आणि प्रत्येक मजल्यावर ज्येष्ठांना फिरण्यासाठी टेरेसेस असतील. बेड-रिडन ज्येष्ठांसाठी मोठी केअर-टेकर टीम २४x७ कार्यरत असेल. संपूर्ण इमारत व्हीलचेअर-अॅक्सेसेबल असेल. प्रत्येक खोलीत पुरेशी हवा, प्रकाश आणि हरित दृश्य याची काळजी घेण्यात आली आहे. या आधुनिक सुविधेमध्ये देशभरातील सुमारे ५००० निराधार, आजारी, अपंग, मानसिक रुग्ण, दृष्टीहीन, अवयवहीन आणि बेड-रिडन ज्येष्ठांना मोफत निवास, प्रेम, आरोग्यसेवा आणि सन्मानपूर्वक जीवन मिळेल.

0 टिप्पण्या