Top Post Ad

देशाची राजधानी असलेली दिल्ली आता प्रदूषणाचीही राजधानी

 देशाची राजधानी असलेली दिल्ली आता प्रदूषणाचीही राजधानी बनली आहे. दिल्ली हे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर असल्याचा एक अहवाल मध्यंतरी आला होता. आता दिल्लीची विषारी हवा लोकांचा जीव घेत असल्याचे धक्कादायक अहवाल समोर आला आहे.   दिल्लीतील सुमारे १५ टक्के रहिवासी प्रदूषणामुळे मरत आहेत. एका अभ्यासातून उघड झालेला हा अहवाल धक्कादायक आहे. हे आकडे २०२३ मध्ये अपेक्षित मृत्यूंवर आधारित आहेत. इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हाल्युएशनने १ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २०२३ मध्ये झालेल्या एकूण मृत्यूंपैकी १७ हजार १८८ रहिवाशांचा मृत्यू प्रदूषणामुळे झाला. याचाच अर्थ राजधानीत प्रत्येक सात पैकी एक मृत्यू हा प्रदूषणामुळे होतो. हा अहवाल धक्कादायकच आहे. जर वर्षाला प्रदूषणामुळे १५ टक्के मृत्यू एकट्या दिल्लीत होत असतील तर देशात किती लोकांचा मृत्यू प्रदूषणामुळे होत असेल याची कल्पनाच न केलेली बरी. उच्च रक्तदाब आणि मधुमेहापेक्षाही प्रदूषणाने अधिक मृत्यू होतो याला सार्वजनिक आरोग्य संकट म्हंटले पाहिजे.

        दिल्लीतील प्रदूषणाने धोक्याची पातळी केंव्हाच ओलांडली आहे.   म्हणूनच दिल्ली हे जगातील  सर्वाधिक प्रदूषित शहर बनले आहे. अर्थात ही काय भूषणावह बाब नाही उलट यामुळे देशाची मान खाली झुकली आहे अर्थात त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही दिल्लीतील प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाय करा  असा इशारा अनेक सामाजिक व सेवाभावी संघटनेने सरकारला  दिला होता मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले.
        केवळ दिल्लीतच नाही तर दिल्लीसह देशातील प्रमुख शहरांनीही प्रदूषणाची धोक्याची पातळी ओलांडली आहे. दिल्लीप्रमाणेच  मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता देखील खालावली आहे.  दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई यासारख्या मोठ्या आणि महत्वाच्या शहरांना प्रदूषणाचा विळखा पडला आहे.  या शहरात वातावरणातील प्रदूषणकारी घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पीएम -  २.५ कणांचे प्रमाण ५३.३ मायक्रोग्राम क्यूबिक मीटर या पातळीवर आले असून ते आरोग्य संघटनेने निर्धारित केलेल्या सुरक्षेच्या पातळीपेक्षा दहापटीने अधिक असल्याचे दिसून आले आहे.    

     आज देशातील सर्वच महत्वाची शहरे प्रदूषणाने गुदमरत आहेत. त्या शहरात राहणाऱ्या नागरिकांचे जीवन प्रदूषणामुळे धोक्यात आले आहे. एकीकडे २१ व्या शतकातील सुखासीन जीवनाचे  मनोहरी चित्र उभे केले जात आहे. स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवले जात आहे तर दुसरीकडे याच शहरांची फुफ्फुसे प्रदूषणाने निकामी होत आहेत. प्रदूषणामुळे या शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषणामुळे या शहरातील नागरिकांना फुफ्फुसाचे, हृदयाचे, रक्ताभिसरणाचे आजार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. न्यूमोनिया, पक्षघात, हृदयविकार, फुफ्फुसाचा कर्करोग यासारखे मोठे आजार प्रदूषित हवेमुळेच होत आहेत. प्रदूषणामुळे दिल्लीसारख्या देशाच्या राजधानीची किती वाईट   अवस्था झाली आहे हे आपण पाहत आहोतच. मागील वर्षी प्रदूषणामुळे दिल्लीतील शाळा कॉलेजसना सुट्टी देण्याची वेळ प्रशासनावर आली आली होती.  

         देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई प्रदूषणाच्या बाबतीत देशाच्या राजधानीची बरोबरी करू लागली आहे. मुंबईचे प्रदूषणही उच्चतम पातळीवर पोहचले आहे.    प्रदूषणामुळे लोकांना शुद्ध हवा मिळणे दुरापास्त झाले आहे. शुद्ध हवेसाठी लोकांना पैसे मोजावे लागत आहे. मुंबई -  दिल्लीसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या शहरात ऑक्सिजन बार सुरू करण्यात आले आहेत. एका तासाला २०० ते ५०० रुपये मोजून नागरिक ऑक्सिजन विकत घेत आहेत. इतके होऊनही आपण त्यातून बोध घेत नाही. 
    या मोठ्या शहरात वाहनांची संख्या  मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या मोठ्या शहरात लोकसंख्येपेक्षा वाहनांची संख्या अधिक आहे.  वाढत्या वाहनांमुळे प्रदूषणात भर पडत आहे. वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुरात प्रदूषणाचे प्रमाण खूप असते.  धूळ, कारखान्यातून निघणारा धूर, बांधकामातून पसरणारे कण, वृक्षतोड, पृथ्वीचे वाढते तापमान, प्लास्टिकचा भस्मासुर अशा अनेक कारणांमुळे प्रदूषणाचा  आलेख उंचावत आहे. 

    वर्षाला १५ टक्के मृत्यू प्रदूषणाने होतात हा अहवाल धोक्याचा इशारा देणारा आहे. यावर वेळीच उपाय केले नाही तर ही आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळेच वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी वेळीच ठोस उपाय करायला हवेत. कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरातून प्रदूषणकारी घटक कमी करण्यासाठी अत्याधुनिक  तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा.  दगड खाणींवर नियंत्रण आणायला हवे. वाहनांची संख्याही कमी करायला हवी. प्रसंगी सम - विषम सारखे कठोर निर्णय घ्यायला हवेत. युरोपीय देशात प्रदूषण कमी करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात याचा अभ्यास करायला हवा. नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. याशिवाय कचऱ्याचे योग्य वर्गीकरण आणि विल्हेवाट तसेच सौरऊर्जेच्या वापरावर भर द्यायला हवा. वृक्षारोपण करुन ते वृक्ष जगवले पाहिजेत. शासन, प्रशासन आणि नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच प्रदूषणाचा हा भस्मासुर रोखता येईल आणि प्रदूषणामुळे होणारे मृत्यूही कमी करता येईल.
  •  श्याम ठाणेदार      पुणे   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com