धम्मचक्र प्रवर्तन दिन किंवा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन हा भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख उत्सव आहे. भारतीय जनतेद्वारे हा उत्सव दरवर्षी अशोक विजयादशमी दिनी नागपूर येथे तसेच स्थानिक परिसरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातील लक्षावधी भारतीय धम्मचक्र प्रवर्तनदिनी नागपूरला येतात. ह्या उत्सवाची पार्श्वभूमी एक धर्मांतरण सोहळा आहे, 1956च्या अशोक विजयादशमीला दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत मुळ भारतीय असलेल्या बौद्ध धर्मात प्रवेश केला आहे. भारतभूमीत जवळपास लुप्त झालेल्या या धम्माचे चक्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गतिमान करत "धम्मचक्र प्रवर्तन" केले; तेव्हापासून हा दिवस "धम्मचक्र प्रवर्तन दिन" म्हणून साजरा केला जातो. तथापि, या सणाला "धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन" असेही म्हणले जाते. कारण याच दिवशी आधी सम्राट अशोकाने भारतभूमीवर हे धम्मचक्र गतीमान केले होते. त्यानंतर परमपूज्य डॉ.बाबासाहेबांनी या भारतभूमीच्या मूळ धम्माची ओळख इथल्या तमाम भारतीयांना करून दिली.

0 टिप्पण्या