लातूर शहर, जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर धम्म चळवळीला गतिमान करणारे भन्ते पय्यानंद थेरो यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व बिहार येथील बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते भन्ते विनयाचार्य यांच्या नेतृत्वाखाली लातूर नगरीत तब्बल ६३० फूट लांबीच्या धम्मध्वजाची भव्य महारॅली आणि जनसंवादाचा ऐतिहासिक सोहळा संपन्न झाला. हजारो उपासक–उपासिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीने संपूर्ण लातूर नगरी धम्ममय झाली होती. पंचरंगी धम्मध्वजाच्या साक्षीने निघालेली ही रॅली केवळ एक मिरवणूक नव्हती, तर धम्माच्या जागृतीचे, समतेच्या लढ्याचे आणि करुणेच्या संदेशाचे दिमाखदार प्रतीक होती. प्रत्येकाच्या ओठांवर मुक्त करा, मुक्त करा बुद्धगया महाविहार मुक्त करा चा घोष, प्रत्येकाच्या हृदयात नवा उत्साह आणि परिवर्तनाची जिद्द झळकत होती. हा क्षण खरंच अविस्मरणीय ठरला. कारण महाराष्ट्रभर सुरु असलेल्या जनसंवाद कार्यक्रमाला लातूर शहरातून नवसंजीवनी मिळाली. या महारॅलीतून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला एक नवी दिशा, एक नवा वेग आला आहे. लातूरच्या भूमीतून दिलेला हा जनतेचा प्रतिसाद हे अधोरेखित करतो की, धम्म चळवळ ही लोकचळवळ होणे काळाची खरी गरज आहे.
हजारो उपासक-उपासिका भंतेजींच्या सोबत चालत होते, त्यांचा प्रत्येक पाऊल श्रद्धेने आणि संकल्पाने ओतप्रोत होता. त्यांच्या मनातील ठाम निर्धार जणू एकच सांगत होता – "महाबोधी महाविहार मुक्त केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही." ही महा रॅली म्हणजे फक्त जमाव नव्हता, तर तो होता हजारो मनांचा एकत्रित आवाज, हजारो हृदयातील प्रज्वलित दीप आणि हजारो पावलांचा संघर्षाचा प्रवास. लातूर शहरातील ही ऐतिहासिक रॅली आज बौद्ध धम्माच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहे. ही रॅली आपल्याला एक प्रेरणा देते श्रद्धा, ऐक्य आणि न्यायासाठी उभे राहिले तर कोणतेही आंदोलन महाआंदोलन ठरते. भन्ते पय्यानंद थेरो नेहमी म्हणतात कि "धम्म चळवळ ही लोक चळवळ झाली पाहिजे" त्यांचे म्हणणे खरंच सार्थ ठरले आहे. जेंव्हा जेव्हा हजारोची मने एकाच ध्येयासाठी एकत्र येतात, तेव्हा खरच इतिहास लिहिला जातो.आपल्या आयुष्यात आपण अनेक रॅली पाहिलेल्या असतील. काही सामाजिक, काही राजकीय पण लातूरच्या भूमीवर काढण्यात आलेली ही धम्म रॅली काही सामान्य नव्हती. ही होती एका ऐतिहासिक संघर्षाची, श्रद्धेची आणि संकल्पाची महारॅली. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ काढलेली ही रॅली लातूरच्या भूमीवर एक वेगळा इतिहास घडवून गेली. तब्बल एक ते दीड किलोमीटर लांबच लांब उपासक-उपासिकांच्या रांगा, ६३० फूट लांब पंचरंगी धम्मध्वज प्रत्येकाच्या मनाला भिडत होता, आणि "मुक्त करा, मुक्त करा महाबोधी महाविहार मुक्त करा" या घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता. या दृश्याने प्रत्येकाच्या अंतःकरणात संघर्षाची ज्योत पेटली होती. या रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे यात फक्त युवक-युवतीच नाहीत तर बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला. महिलांची आणि युवतींची उपस्थिती लक्षवेधी होती. हे फक्त एक आंदोलन नव्हते, तर हे होते एक महाआंदोलन सत्य, न्याय आणि बौद्ध वारशाच्या संरक्षणासाठीचे.
- मिलिंद आशा तानाजी धावारे,.... लातूर.

0 टिप्पण्या