मुंबई शहर व उपनगरात नुकत्याच झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मुंबईतील विविध समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला होता. महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने अत्यंत तत्परतेने स्वच्छता मोहीम हाती घेत मुंबईतील गिरगाव, दादर, माहीम, जुहू, वेसावे (वर्सोवा), मढ-मार्वे आणि गोराई या समुद्रकिनाऱ्यांचा परिसर स्वच्छ केला आहे. दिनांक १५ ते २३ ऑगस्ट २०२५ पर्यंत एकूण ९५२.५ मेट्रिक टन कचऱ्याचे निष्कासन करण्यात आले आहे. सुमारे ३८० कर्मचाऱ्यांनी एकूण ६ संयंत्रांच्या सहाय्याने २४ x ७ अथक प्रयत्न करून हे सहा समुद्रकिनारे पूर्ववत स्वच्छ, सुंदर केले.
दिनांक १९ आणि २० ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, महानगरपालिकेच्या संबंधित विविध विभागांच्या वतीने तात्काळ विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याच अनुषंगाने, पावसामुळे निर्माण झालेला कचरा संकलित करून त्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
मुंबईतील गिरगाव, दादर, माहीम, जुहू, वेसावे (वर्सोवा), मढ-मार्वे आणि गोराई या समुद्रकिनाऱ्यांच्या परिसरात जमा झालेला कचरा संकलित करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये दिनांक २३ ऑगस्ट २०२५ पर्यंत या समुद्रकिनाऱ्यांवरून एकूण ९५२.५ मेट्रिक टन कचरा हटविण्यात आला आहे. यासाठी ३८० स्वच्छता कर्मचारी ६ संयंत्रांच्या सहाय्याने २४ x ७ कार्यरत होते. यामध्ये गिरगाव – २३ मेट्रिक टन (१६ मनुष्यबळ आणि १ संयंत्र) दादर-माहीम – ३०० मेट्रिक टन (४८ मनुष्यबळ आणि १ संयंत्र) वेसावे – २०० मेट्रिक टन (१२० मनुष्यबळ आणि १ संयंत्र) जुहू – ३७५ मेट्रिक टन (१५० मनुष्यबळ आणि १ संयंत्र) मढ-मार्वे – ३४.५ मेट्रिक टन (३५ मनुष्यबळ आणि १ संयंत्र) गोराई – २० मेट्रिक टन (१४ मनुष्यबळ आणि १ संयंत्र)


0 टिप्पण्या