संभाजीनगरची एक तरुणी सासरच्या त्रासाला कंटाळून पुण्यात एका मैत्रिणीच्या सहाय्याने या तीन मुलींच्या फ्लॅटवर राहायला आली. संभाजीनगरच्या मुलीच्या सासरच्यांनी तिच्या विरोधात मिसिंगची तक्रार दाखल केली होती. या मुलीला शोधण्यासाठी संभाजीनगरचे पोलीस पुण्यात दाखल झाले आणि तिच्या मोबाईलच्या लोकेशन नुसार पुण्यातील कोथरूड परिसरात राहणाऱ्या तीन मुलींच्या घरी गेले. त्यावेळी संभाजीनगरची मुलगी कामासाठी निघून गेली होती. या तीन मुलींनी त्या संभाजीनगरच्या मुलीला मदत केली. पोलिसांनी चौकशी करताना तीला मदत करणाऱ्या या तीन मुलींच्या फ्लॅटमध्ये घुसून त्यांचे कपडे चेक केले. सोबतच त्यांना अर्वाच्या भाषेत शिवीगाळ देखील केली आणि जाती वाचक भाषेत देखील त्यांना प्रश्न विचारले.
तुम्ही महार मांगाच्या पोरी आहात, किती मुलांसोबत झोपलेत आणि लेसबियन आहात का ? अशा घाणेरड्या शब्दात पुण्यातील कोथरूड पोलिसांनी या मुलींना मारहाण आणि जातीवाचक शब्दात शिवीगाळ केल्याचा आरोप मुलींनी केला आहे. यामध्ये असणाऱ्या महिला पोलिस यांनी मुलींशी गैरवर्तन केले, त्याचबरोबर तुमच्या या वागण्यामुळे एक दिवस तुझा खून देखील होऊ शकतो असं म्हणत धमकी दिल्याचेही या तरुणीने म्हटलं आहे. कारवाईच्या मागणीसाठी त्या मुली सकाळपासून पोलीस आयुक्तालयात बसून आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर, युवा नेते सुजात आंबेडकर, आमदार रोहित पवार यांनी त्या मुलींच्या उपस्थितीत पोलिसींची भेट घेऊन कारवाईची मागणी केली आहे.
याप्रकरणी या मुली आणि त्यांचे सहकारी आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. हा सगळा प्रकार अतिशय धक्कादायक असल्याचे येथे आंदोलन करणाऱ्या वंचितच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. संबंधितांविरोधात अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. पीडित मुलींपैकी दोन मुलींची मानसिक अवस्था ठीक नाहीये. हे प्रकरण इथेच थांबलं नाही तर या मुलींनी या पोलिसांना आयडेंटिटी विचारली असता या पोलिसांनी थेट कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तुम्हाला तिथे सगळं सांगतो असं म्हणत थेट पोलीस स्टेशनमध्ये नेलं. त्यांना तिथे मारहाण केली. त्यांच्यासोबत पुन्हा एकदा वेगवेगळ्या पद्धतीची विचारणा केली आणि या सगळ्यांमुळेच या तिन्ही मुली आता मोठ्या धक्क्यात आहेत.
श्वेता एस या मुलीने फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट करत हा सगळा प्रकार सविस्तरपणे सांगितला आहे. पोलिसांनी या मुलींच्या चारित्र्याबद्दल अपमाजनक शब्द वापरले, तसेच तोकड्या कपड्यांवरुन वाईटसाईट बोलले, असा आरोप श्वेता एस हिने केला आहे. पीएसआय कामटे यांनी एका मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण आणि चुकीचा स्पर्श केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या तिन्ही मुली पुण्यात नोकरी करतात, कोथरुड परिसरात राहतात. कोथरुड पोलीस ठाण्यातील पीएसआय प्रेमा पाटील या मुलींना म्हणाल्या की, तुम्ही महार-मांगाचे ना, मग तुम्ही असचं वागणार आहे, तुम्ही वाया जाणार आहात. तुमची जात अशीच आहे, तू किती पोरांसोबत झोपल#$स, तू रां# आहेस, असे प्रेमा पाटील यांनी म्हटल्याचा आरोप आहे.
तसेच छत्रपती संभाजीनगरचे पीएसआय कामटे यांनीही मुलींशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप आहे. एका मुलीने पोलिसांना उत्तर द्यायचा प्रयत्न केल्यावर पीएसआय कामटे संतापले. या मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच कामटे यांनी मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप आहे. तुमच्या दोन्ही मैत्रिणींचे स्कार्फ सेम आहेत, मग तुम्ही लेस्बियन आहात का? तुम्ही दोघीही दिसताही तशाच. तुम्ही किती तोकडे कपडे घालता. तुम्ही रां# आहात का? तुम्ही दारु पीत भटकत असाल. तुला बाप नाही तर तुला तर सोडूनच दिलं असेल, असे कामटे यांनी म्हटल्याचा आरोप आहे.
यावर एका मुलीने आमचं ऐकून घ्या अशी विनवणी केली. तेव्हा कामटे यांनी म्हटले की, तू अशीच वागलीस तर एक दिवस तुझा खून होईल. उद्या तुम्हाला नोकरीसाठी कॅरेक्टर सर्टिफिकेट लागेल, तुमच्यासारख्या मुलींना आम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट देणार नाही. आम्ही तुमचं करिअर बरबाद करु, अशी धमकी पीएसआय कामटेंनी दिल्याचा आरोप आहे. पोलिसांनी हायप्रोफाईल केसचं प्रेशर आहे दाखवून या मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ गेला. यासाठी पोलिसांनी माफी मागितली पाहिजे. अन्यथा आम्ही हे प्रकरण लावून धरु, अशी मागणी श्वेता एस या तरुणीने केली आहे.
सहायक पोलिस निरीक्षक प्रेमा पाटील, संभाजीनगर पोलिस स्टेशनचे अमोल कामटे आणि छत्रपती संभाजीनगर येथील महिला कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांच्यावर थेट मारहाणीचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दखल घेत त्या मुलींशी फोनवरुन केली चर्चा करुन कारवाईचं आश्वासन दिलं आहे. रुपाली चाकणकर या प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती आहे.
पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी या प्रकरणात तथ्य असेल तर कारवाई करू असं सांगितल आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि पोलीस उपयुक्त संभाजी कदम हे या प्रकरणी काय कारवाई करतात पाहावं लागेल.
वैष्णवी हगवणे प्रकरण जेव्हा गाजलं तेव्हा सामाजिक कार्य करणाऱ्या मुलींनी नंबर व्हायरल केले. त्या सामाजिक कार्य करणाऱ्या मुलीशी संपर्क करण्यात आला. ती मुलगी त्या मुलीकडे गेली. पोलिसांनी चौकशी करताना त्यांना मारहाण केली.जातीवाचक बोललं गेलं, अत्यंत खालच्या दर्जाचे बोललं गेलं. त्या मुलींपैकी एकीला जातीवाचक बोलत उभे केले गेले, एका पोलीस इन्स्पेक्टरनं तुमचा असा अटिट्युड असेल तर तुमचा मर्डर होईल अशी धमकी दिली गेल्याचा आरोप सुजात आंबेडकर यांनी केला आहे. त्या तीनही मुलींना घर मालकांनी रस्त्यावर काढलं आहे. पोलीस ऑफिस करसपॉन्डेड देत नाहीत. तीन दिवसांपासून त्या तक्रार दाखल करून घ्या म्हणताय पण ते होत नाही. पोलीस दडपशाही करत आहे, असा आरोप सुजात आंबेडकर यांनी केला. अट्रासिटी दाखल करत नाहीत. जोपर्यंत एफआयर दाखल होत नाही तो पर्यंत आम्ही पोलीस आयुक्तालय सोडणार नाही, असं सुजात आंबेडकर म्हणाले. पोलिसांकडून 48 तासांचा वेळ मागितला जात आहे. राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे होऊ शकत नाही, असंही सुजात आंबेडकर म्हणाले.
राज्यातील पोलीस यंत्रणा असून अडचण नसून खोळंबा अशी आहे. गुन्हेगार मोकाट फिरतात आणि पोलीस मात्र सर्वसामान्य जनतेवर कायद्याची दंडेलशाही दाखवत आहेत. पुण्यातील कोथरूड पोलीसांनी तीन तरुणींच्या घरात घुसून त्यांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेतले, त्यांना जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. ज्या पोलिसांनी हा प्रताप केला आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ का केली जात आहे? या पोलिसांवर ऍट्रॉसिटी कलमाखाली तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
एका महिलेला मदत केल्याच्या कारणावरून या तीन सामाजिक कार्यकर्त्या तरुणींच्या घरात घुसून पोलिसांनी ही कारवाई केल्याचे समजते. या मुजोर पोलिसांना कोण पाठिशी घालत आहे? पुण्याचे पोलीस आयुक्त काय खुर्चीवर बसून झोपा काढतात काय. कोणाच्या दडपणाखाली पोलीस काम करत आहेत. तीन तरूण मुलींवर पोलीस अत्याचार करतात आणि कारवाई होत नाही. एफआयआर नोंदवण्यास कोणत्या मुहुर्ताची वाट पहात आहेत. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व पुण्याच्या पालकमंत्र्यांनी जातीने या प्रकरणी लक्ष घालून मुजोर पोलिसांवर कठोर कारवाई करावी.
पुण्यात ड्रग्जचा काळाबाजार खुलेआम सुरु आहे, कोयता गँगचा हैदोस सुरु आहे, त्याला आळा घालण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. पुण्यात दादागिरी वाढली आहे असे खुद्द मुख्यमंत्रीच जाहीरपणे सांगत आहेत पण कारवाई मात्र करत नाहीत, असा हतबल मुख्यमंत्री काय कामाचा. पुणे पोलीसांनी सर्वसामान्य लोकांना कायद्याचा नाहक बडगा दाखवण्याऐवजी पुण्यातील अवैध धंदे व गुन्हेगारी मोडीत काढण्याचे काम करण्याची गरज आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
0 टिप्पण्या