2019च्या लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्षात झालेले मतदान आणि मोजलेले मतदान यामध्ये महाराष्ट्रातील सर्वच मतदारसंघात खूप मोठी तफावत होती. झालेले मतदान आणि मोजलेले मतदान हि संख्या सारखी असायला हवी. परंतु या निवडणुकीत झालेल्या मतदानापेक्षा मोजलेल्या मतदानाची आकडेवारी जास्त होती. 2019 च्या या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने प्रचंड मते घेतली होती. तब्बल दहा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी आणि भाजप उमेदवारांमध्ये सरळ लढत झाली होती.तर इतर उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते परंतु कॉंग्रेस पेक्षा थोडाच फरक वंचित बहुजन आघाडी उमेदवारांचा होता. दोन दोन लाखांच्या सभा तेंव्हा बाळासाहेब आंबेडकरांच्या झाल्या होत्या. दरम्यान अनेक उमेदवारांना वाटत होते की आपण निवडून येतो.परंतु निकालानंतर वेगळेच चित्र निर्माण झाले होते.निकालानंतर मा बाळासाहेब आंबेडकरांनी निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवर देशात पहिल्यांदा बोट ठेवले. कोणकोणत्या मतदारसंघात आकडेवारी जुळत नाही याबाबत जाहिरपणे भाष्य केले. मिडीयात बातम्या आल्या.
निकालानंतर झालेले मतदान आणि मोजलेल्या मतदानाचा डाटा तेंव्हा निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला होता. जसेही मा बाळासाहेब आंबेडकरांनी निवडणूक आयोगाची पोलखोल करणे सुरू केले तसे तातडीने निवडणूक आयोगाने आपल्या वेबसाईटवरचा डाटाच डिलीट केला. केंद्रीय निवडणूक आयोगाने डाटा डिलीट करण्यापुर्वी पक्षाने सदर माहितीचे स्क्रीन शॉर्ट काढून ठेवले होते हे विशेष. 2004 पासून इव्हिएमच्या वोट चोरी बद्दल एकटेच लढणारे बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्या उमेदवारांच्या मतदारसंघातील सर्व उमेदवारांना मिळालेल्या मतदानाची माहिती जुळवली.सोबतच फॉर्म नंबर 17 C (मतदानकेंद्र निहाय झालेले मतदान) जुळवण्यात आले. आणि संपूर्ण डेटा घेऊन मा बाळासाहेब आंबेडकर यांनी हायकोर्टात अपील दाखल केले.केंद्रीय निवडणूक आयोगाला व अन्य संबंधीतांना या ठिकाणी प्रतिवादी करण्यात आले होते. कोर्टात प्रकरण गेल्यावर सदर प्रकरणाची सुनावणी घेण्यास कोर्ट फारसे उत्सुक दिसले नाही. आणि निवडणूक आयोगही त्यांची पारदर्शकता कोर्टात मांडण्यास विलंब लावत आहे. 2024 च्या निवडणूकीनंतर इव्हिएमच्या गडबडीचा मुद्दा परत मा बाळासाहेब आंबेडकर यांनी देशासमोर ठेवला. परंतु लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कॉंग्रेससह महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्याने हा मुद्दा महाविकास आघाडीने धुडकावून लावला. परत 2024 महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत सायंकाळी सहा नंतर झालेल्या 76 लाख मतदानाची आकडेवारी (डेटा) निवडणूक आयोगाला मागीतला परंतु सदर बाबतीत आमच्या कडे माहिती नाही म्हणून EC ने जबाबदारी झटकली. निवडणूकीच्या माध्यमातून लोकशाहीच्या सामाजिकरणाचा आग्रह धरणारे व इव्हिएम घोटाळ्या विरोधात सातत्याने लढणाऱ्या बाळासाहेब आंबेडकरांनी आपला लढा परत मुंबई हायकोर्टाकडे वळवला. परंतु कोर्टाने आपल्या न्यायाची कवाडे बंद (कदाचित दबावात) करून सदर अपील निर्लज्ज भाषा वापरून फेटाळून लावले हे सर्वांना माहितीच आहे.
हे सर्व सांगण्याचा खटाटोप यासाठीच की, राहुल गांधी यांनी ईसीच्या "वोट चोरी " अनुषंगाने "लाव रे..व्हिडीओ " स्टाईल केलेले प्रेझेंटेशन तसेच आतापर्यंत इव्हिएमला दोष न देण्यात अर्थ नाही म्हणणारे पवार साहेब यांनी "दोन अज्ञात व्यक्ती जे विधानसभा निवडणुकीत160 मतदारसंघात आघाडी मिळवून देणार होते !"... बद्दल मिडीयात चर्चा होत आहे. परंतु 2024 लोकसभा निवडणुकी आधी 17 मार्च 2024 रोजी (कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रा समापन कार्यक्रम)मुंबईत शिवाजी पार्क च्या जाहीर सभेत श्री राहुल गांधी,प्रियंका गांधी व पवार साहेब व देशातील अन्य विरोधी पक्षनेते यांच्या उपस्थितीत मा बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेले ऐतिहासिक भाषण म्हणजे राहुल गांधी यांचे वोट चोरी व पवार साहेब यांचे दोन अज्ञात व्यक्ती स्टोरीला थोबाडीत मारणारे आहे.
एवढेच नाही तर इव्हिएम विरोधातील बाळासाहेब आंबेडकरांची लढ्यात सातत्य तर आहेच. एवढेच नव्हे तर त्यांनी " बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी !"असे अन्य नेत्यांप्रमाणे न करता थेट न्यायालयात नेला.अन लोकांच्या न्यायालयात तर फार पुर्वी पासूनच नेला आहे. पुण्याच्या एका जाहीर सभेत इव्हिएमची प्रतिकृती जाळून याला लोक लढ्याचे स्वरूप दिले आहे तर इव्हिएमच्या विरोधात राज्यभर स्वाक्षरी मोहीम राबवून व अन्य माध्यमातून लोकलढा उभारला आहे. मात्र सवर्ण मिडिया बाळासाहेब आंबेडकर यांच्या लोकलढ्याला झाकून ठेवण्यासाठी राहुल गांधी यांच्या वोट चोरी ला महत्त्व देत आहे.
Suresh Shirsat

0 टिप्पण्या