मुंबई महानगरपालिकेच्या भूमिगत मासळी मंडई प्रकल्पाच्या विरोधात आणि पारंपरिक मासळी व्यवसायाचे रक्षण करण्याच्या मागणीसाठी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने २२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ‘कोळी जनआक्रोश मोर्चा’ काढण्याची घोषणा केली आहे. हा मोर्चा क्रॉफर्ड मार्केट येथून महापालिका मुख्यालयापर्यंत निघणार आहे.आझाद मैदान येथील मुंबई मराठी पत्रकार संघात आज झालेल्या पत्रकार परिषदेत समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल, सरचिटणीस संजय कोळी, महिला अध्यक्षा नयना पाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
तांडेल म्हणाले की, सन १९७१ पासून कार्यरत असलेल्या पलटण रोड येथील मासळी मंडईला महापालिकेच्या धोरणांमुळे संकट निर्माण झाले आहे. संपूर्ण राज्यातून दररोज १५,००० पेक्षा जास्त मासळी विक्रेते, व्यापारी, महिला आणि वाहतूकदार या मंडईत व्यवसाय करतात. येथे ८७ घाऊक व्यापारी, १५७ कोळी महिला विक्रेते आणि अन्य घटक कार्यरत आहेत. पालिकेने या भूखंडाचे आरक्षण रद्द करून तो भूखंड अवा डेव्हलपर्स या खाजगी व्यावसायिकाला केवळ ३६९ कोटी रुपयांमध्ये ३० वर्षांच्या भाडेकरारावर दिला. पुढील ३० वर्षांसाठी केवळ १ रुपया ते १००१ रुपयांच्या दरात भाडे घेतले जाणार असल्याने हा व्यवहार संशयास्पद असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
महात्मा ज्योतिबा फुले (MJP) मंडईत जागा देण्याचे आश्वासन पालिकेने दिले होते. मात्र, ती जागा बेसमेंटमध्ये असून, अद्याप ४० टक्केच काम पूर्ण झाले आहे. तरीही तातडीने स्थलांतरासाठी पालिका दबाव टाकत असल्याचा आरोप झाला. मंडईसमोरील फुटपाथवर तात्पुरत्या शेडमध्ये व्यवसाय करा, अशा नोटिसा मासळी विक्रेत्यांना देण्यात येत आहेत.बळवंतराव पवार (मुंबई फ्रेश फिश असोसिएशन) यांनी सांगितले की, हा भूखंड कोळी समाजाला ४०० कोटी रुपयांना द्यावा अशी मागणी आहे. अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल.
ताडदेव परिसरातील कोळी महिलांच्या रोजगारावरही ब्रिज बांधकामाचा परिणाम झाल्याने त्यांना नवीन परवाने देण्याची मागणी केली जात आहे.२२ जुलैच्या मोर्चात राज्यभरातून हजारो कोळी बांधव सहभागी होणार असून, हा आंदोलनाचा प्रारंभ असून तो भूखंड कोळी समाजाच्या हक्कात येईपर्यंत लढा सुरू राहील, असा निर्धार यावेळी करण्यात आला.

0 टिप्पण्या