Top Post Ad

बुद्ध लेण्यांवर होत असलेले अतिक्रमण....लाक्षणिक धरणे आंदोलन

राज्यातील बुद्ध लेण्यांवर होत असलेले अतिक्रमण आणि बुद्धप्रतिमांचे विद्रुपीकरण याकडे भारतीय पुरातत्व विभाग जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.  पुरातत्व विभागाच्या या निष्क्रियतेविरोधात आज मुंबईतील आझाद मैदानावर  बुद्ध लेणी संवर्धन समिती आणि सर्व लेणी संवर्धक समूह, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या आंदोलनात राज्यभरातून  लेणी संवर्धक, अभ्यासक, पुरातन वास्तू प्रेमी आणि बौद्ध समाज मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर आणि सनातन धम्मचे विलास खरात, आंबेडकरी साहित्यिक ज.वि. पवार, भारतीय बौद्ध महासभेचे बारकू गायकवाड, तसेच गोपीचंद कांबळे,  धम्मपाल माशाळकर, संजय पाईकराव, परमानंद गेडाम, महेंद्र शेगांवकर, अशोक तपासे, अशोक नगरे, प्रशांत कसबे यांच्यासह अनेक मान्यवर तसेच भिक्खू संघ उपस्थित होता.

 यावेळी भीमराव आंबेडकर म्हणाले की, भारतातील ८४ हजार बुद्ध लेण्यांपैकी अनेक लेण्या अतिक्रमण, दुर्लक्ष आणि विद्रुपीकरणाच्या विळख्यात सापडल्या आहेत. भारतीय पुरातत्व विभाग बुद्ध वारसा संपवण्याचा कट करत असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. आता वेळ आली आहे की, पुरातत्व खात्याकडे बौद्ध वारशाबाबतचा पवित्रा स्पष्ट करण्यासाठी सर्व बौद्ध अनुयायांनी एकजूट होऊन आवाज उठवावा. तर सनातन धम्मचे विलास खरात म्हणाले, अनेक कार्यकर्ते म्हणतात आता आंदोलन दिल्लीला केले पाहिजे. जंतरमंतरवर मोठे आंदोलन झाल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही. पण दिल्लीत बसलेले सरकार कुणाच्या इशाऱ्यावर चालत आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे. आरएसएसच्या मोहन भागवत यांच्या इशाऱ्यावर हे सरकार चालत आहे. आणि आरएसएसचे मुख्यालय आहे नागपूरला. दोन ऑक्टोबरला विजयादशमी दिन आहे आणि आरएसएसचा याच दिवशी मुख्यालयात कार्यक्रम असतो त्यावेळी कदाचित महाबोधि विहार शिवलिंगमंदीर म्हणून घोषित करण्याचे षडयंत्र सुरू आहे. यासाठी आपण मोठ्या संख्येने आरएसएसच्या मुख्यालयाला घेराव घालून याचा जाब विचारला पाहिजे. जिथून प्रॉब्लेम क्रिअेट होत आहेत. तिथूनच त्याचे सोल्यूशन केले पाहिजे असे स्पष्ट मत खरात यांनी व्यक्त केले. 

राज्यभरातील विविध लेणी संवर्धन संस्था आणि संघटनांनी एकत्र येत आंदोलनाला पाठिंबा दिला. यात सेव बुद्धा केव अँड हेरिटेज लेणी संवर्धक (पुणे), समता सैनिक दल (मुंबई युनिट), सनातन धम्म (महाराष्ट्र), बुद्धभूमी प्रतिष्ठान (मावळ), प्रबुद्ध भारत फाउंडेशन (जुन्नर), भिम टायगर संघटना (महाराष्ट्र), त्रिरत्न धम्म संस्कार वर्ग (मुंबई), आम्ही आंबेडकरवादी संघटना (मुंबई) यांचा सहभाग उल्लेखनीय ठरला.
या आंदोलनातून पुढील मागण्यांचे निवेदन सरकारला देण्यात आले.

  • बुद्ध लेण्यांवरील अतिक्रमण केव्हा काढणार?
  • बेवारस बुद्ध लेणी आणि स्तूप ASI मध्ये केव्हा समाविष्ट होणार?
  • बुद्ध लेण्यांच्या विकासासाठी निधी कुठे जातो?
  • प्रशिक्षित गाईडची नेमणूक केव्हा होणार?
  • लेण्यांवर मूलभूत सुविधा – पाणी, वीज, रस्ते, स्वच्छतागृह, बेंच – कधी उपलब्ध होणार?
  • लेणी परिसरातील १०० मीटरमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामांना जबाबदार कोण?
  • इतर पुरातन वास्तूंप्रमाणे लेण्यांना 'बुद्ध लेणी' म्हणून नामफलक का नाही?
  • लेण्यांचा ऐतिहासिक माहिती फलक का लावला जात नाही?



  • टिप्पणी पोस्ट करा

    0 टिप्पण्या

     READ / SHARE  / FORWARD 
    JANATA  NEWS  xPRESS

    निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
    for Donation
    G pay 8108603260 

    संपादक: सुबोध शाक्यरत्न  
    M : 8108658970

    Email- pr.janata@gmail.com