भाजप सरकारने भारत देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. याकरिता प्रचंड गाजावाजा करण्यात आला. प्रचंड जाहिरातबाजी करण्यात आली. मात्र या जाहिरातीतून केवळ आणि केवळ मोदी शहा यांनाच अधिक प्रसिद्धी देण्यात आली. स्वातंत्र्यसैनिकांचा केवळ नाममात्र वापर करण्यात आला. इतकेच काय तर या निमित्ताने निर्माण करण्यात आलेल्या वेबसाईटवर स्वातंत्र्य सैनिकांचे प्रोफाईलच नव्हते. केवळ सर्च इंजिनमध्ये ते दाखवण्यात येत होते. प्रत्यक्षात नो डाटा अव्हेलेबल असे दिसून येत होते. अशा तऱ्हेने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा केवळ एक इव्हेन्ट म्हणून भाजप सरकारने साजरा केल्याचा आरोप पी.साईनाथ यांनी केला. जनवादी महिला संघटनेच्या वतीने स्वातंत्र्यसैनिक कॅप्टन लक्ष्मी सहगल यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
२३ जुलै हा जनवादी महिला संघटनेच्या संस्थापक सदस्या आणि स्वातंत्र्यसैनिक कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचा स्मृतिदिन. दरवर्षी साजरा करण्यात येतो. या वर्षी,हा दिवस देशभर 'साम्राज्यवाद विरोधी दिन' म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनामध्ये साम्राज्यवाद विरोधी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून पी.साईनाथ उपस्थित होते तसेच मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदिप चव्हाण यांच्यासह जनवादी महिला संघटनेच्या अनेक पदाधिकारी उपस्थित होत्या.साम्राज्यवादाचा वाढता धोका याबाबत पी.साईनाथ यांनी यावेळी विस्तृतपणे भूमिका मांडली. स्वातंत्र्य (freedom) आणि स्वतंत्र (independent) यामध्ये खूप अंतर आहे. काही निवडक स्वातंत्र्यसैनिक विशेषकरून महिला स्वातंत्र्यसैनिकांवर पुस्तक लिहिले आहे. ज्याकरिता या स्वातंत्र्यसैनिकांशी मला प्रत्यक्ष संवाद साधता आला. त्यावेळी प्रत्येकाने स्वतंत्र भारताकरिता आम्ही लढलो स्वातंत्र्याकरिता नाही, असे निक्षून सांगितले. त्यांच्या बोलण्याचा आता प्रत्येक भारतीयाला प्रत्यय येत आहे. आज आपण स्वतंत्र नाही प्रत्येक भारतीय स्वातंत्र्यात वावरणारा एक गुलाम म्हणूनच जगत असल्याचे दिसून येत आहे. कारण आजही शेतकऱ्यांना आपल्या हक्कासाठी प्रचंड आंदोलने करावी लागत आहे. देशाच्या इतिहासात 56 आठवडे चालणारे शेतकऱ्यांचे आंदोलन आणि त्यामध्ये 800हून अधिक शेतकऱ्यांचे बलिदान हे कशाचे प्रतिक आहे असा सवालही यावेळी पी.साईनाथ यांनी उपस्थित केला. 1991 च्या काळात फोर्ब्सच्या अति श्रीमंतांच्या यादीत केवळ एकही नाव नव्हते. त्यानंतर 2019 पर्यंत त्यात केवळ पाच ते सहा जणांची भर पडली. मात्र 2019 नंतर अचानक ही यादी कैक पटीने वाढली. आज या यादीत भारतातील 211 लोकांची नावे आहेत जे अरबोपती आहेत.
आज या 211 लोकांच्या हातात देशाची 26 टक्के जीडीपी आहे. या लोकांंकडे देशाची 1 ट्रिलीयन डॉलर इतकी संपत्ती आहे. जी आपल्या देशाच्या एकूण कृषी बजेटच्या 62 टक्क्यांनी अधिक आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांची वैयक्तीक मालमत्ता ही आपल्या कृषि बजेटपेक्षा 7.5 पटीने जास्त आहे. कोरोना काळ सर्वसामान्य जनतेसाठी प्रचंड वाईट काळ असल्याचे आपल्याला दिसते मात्र या श्रीमंतांसाठी हा काळ अधिक श्रीमंती घेऊन आला. कोरोना काळ आणि कोरोनानंतरचा काळ या चार वर्षात अचानक असे काय झाले की भारतातील अब्जोधीशांचा संख्येत वाढ झाली. याबाबत कोणतीही चर्चा कोणत्या माध्यमातून होत नसल्याची खंत साईनाथ यांनी व्यक्त केली. आज कार्पोरेट जगत आणि शेतकरी यांच्यातील दरी प्रचंड वाढत आहे. कृषिप्रधान देशातील शेतकरी आजही आत्महत्या करीत आहे. तर कार्पोरेट जगत झपाट्याने वाढत आहे. यामध्ये आपण कुठे आहोत. कुणाच्या बाजूने आहोत. याचा विचार करूनच ही साम्राज्यवादाची लढाई आपल्याला लढायची असल्याचे शेवटी पी.साईनाथ यांनी सांगितले.
पी.साईनाथ यांचे संपूर्ण भाषण ऐकण्यासाठी ↴

0 टिप्पण्या