बेस्ट प्रशासनाकडून सुरू असलेल्या ए-४९४ क्रमांकाच्या बस सेवेमुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. विशेषतः संध्याकाळच्या गर्दीच्या वेळात घाटकोपरहून सुटणाऱ्या ए-४९४ बस या ठरलेल्या मार्गानुसार रेतिबंदर, पारसिक खारीगोवनपर्यंत न नेता, मधेच तीन हात नाक्यावरच थांबवल्या जात आहेत.घाटकोपरहून सायंकाळी ५:१२, ५:३५, ५:५९ व नंतर सुटणाऱ्या बसेस तीन हात नाक्यावरच संपवल्या जात आहेत. प्रवाशांसाठी ही बस कल्याण आणि रेतिबंदर दरम्यानची एकमेव बेस्ट सेवा असल्यामुळे शेकडो कार्यालयीन प्रवाशांना याचा फटका बसतो आहे.
यासंदर्भात बेस्टच्या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क केल्यावर प्रशासनाने मान्य केले की, मागील फेऱ्यांतील उशीरामुळे ही ‘शॉर्ट ट्रिप’ सेवा राबवली जात आहे. पण प्रवाशांचे म्हणणे आहे की, ही वेळ कार्यालय सुटण्याची गर्दीची वेळ असते, त्यामुळे अशावेळी सेवा अर्धवट ठेवणे प्रवाशांच्या मूलभूत गरजांवर घाला आहे.स्थानिक रेल्वे आधीच अत्यंत गर्दीची असते, त्यामुळे प्रवाशांसमोर दुसरा पर्यायही उपलब्ध नाही. परिणामी, अनेकांना तीन हात नाका येथेच उतरावे लागते आणि पुन्हा रेल्वे स्टेशन किंवा पर्यायी बसची वाट बघत ताटकळत रहावे लागते.मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे उपाध्यक्ष सिध्देश देसाई यांनी बेस्टकडे मागणी केली आहे की, या बससेवा शॉर्ट-ट्रिप न करता पूर्ण रेतिबंदरपर्यंत सुरू ठेवाव्यात. तसेच, सकाळी कळवा ते मुलुंडदरम्यान अधिक फेऱ्या वाढवाव्यात, जेणेकरून प्रवाशांचा ओघ रेल्वेकडून रोडवर वळेल आणि अतिगर्संदी मुळे होणारे संभाव्य रेल्वे अपघात टाळता येतील. बेस्ट प्रशासनाने या गंभीर तक्रारीची तातडीने दखल घेऊन आवश्यक पावले उचलावीत, हीच प्रवाशांची मागणी आहे.
0 टिप्पण्या