नामदेव ढसाळच्या 76 व्या जन्मदिनानिमित्त आयोजित 'सारं काही समष्टी साठी' या कार्यक्रमात सांस्कृतिक मंत्री आशीष शेलारने मांडलेला नामदेव ढसाळ: नामदेव ढसाळ यांचे विचार हे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदयाच्या विचारांशी जुळणारे होते.. इत्यादि.. इत्यादि..
संघी आशीष शेलारच्या सदर विधानावर महाराष्ट्रातील काही साहित्यिक, कलावंत व सामाजिक कार्यकर्ते यांनी तीव्र आक्षेप घेत शेलारचा जाहिर निषेध केलाय. या मंडळींचं म्हणणं पडलं की, _'मनुस्मृतीचे समर्थन करणारे, शंकराचार्यला पूज्य मानणारे, हिंदू धर्मातील वर्णाश्रम पद्धतीचे, विषमतेचे,जाती-धर्म व्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या RSS च्या सनातनी विचार व धर्मांधतेचे विष पेरणाऱ्या जनसंघचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या सोबत नामदेव ढसाळ यांची तुलना म्हणजे विद्रोही कवी, दलित पँथर संस्थापक, शंकराचार्यावर चप्पल फेकून मारणारा नामदेव ढसाळ यांचा अवमान होय.'_ सदर कार्यक्रमास हजेरी लावलेल्या नामदेव ढसाळच्या नातेवाईकांना मात्र असं वाटलं नसावं कारण त्यांनी संघी आशीष शेलारच्या मांडणीला विरोध केल्याचं दिसत नाही.. असो.
खरंतर, 1997 साली जहरी धर्मांध बाळ ठाकरेशी लंगट करत तर 2006 साली मनुविकृत गोळवलकरच्या जन्मशताब्दी निमीत्त आयोजित कार्यक्रमात तत्कालीन सरसंघचालक के. सुदर्शनच्या गळ्यात पडत RSS ची मुक्तकंठाने स्तुती करुन नामदेव ढसाळनी अगदी 'टाहो फोडून' सांगितलंय की तो आंबेडकरी विचारांचा नाही तर आंबेडकरी विचारद्रोही आहे.. 'विद्रोही' नव्हे तर 'प्रतिगामी' आहे. तरीही दलित चळवळीत, साहित्यिक मंडळीत त्याला ओढूनताणून आंबेडकरी वा विद्रोही साबित करण्यासाठी अहमहमिका सर्रास सुरू असते. सदर 'निषेध प्रकरण' त्यातलाच एक प्रकार. 1997 अन 2006 साली नामदेव ढसाळने असं 'शेण' खाल्लं नसतं तर संघी आशीष शेलारची काय बिशाद त्याला दीनदयाळ उपाध्याय सोबत बसविण्याची, एव्हढी साधी गोष्ट या नामदेव ढसाळ प्रेमी साहित्यिक, कलावंत अन सामाजिक कार्यकर्ते मंडळींच्या लक्ष्यात येत नसेल? की मुद्दामहून नामदेवचा प्रतिगामीपणा दडवून त्यावर 'क्रांतीकारी-आंबेडकरी-विद्रोही' असा मुलामा चढवायचा असतो यांना...आपल्या सोयीसाठी??
1997 साली घाटकोपर रमाबाईनगर येथिल पुतळा विटंबना व भीषण हत्याकांडानंतर बाळ ठाकरेनी सामनातून बाबासाहेबांच्या पुतळ्याविरोधात गरळ ओकण्याची व आंबेडकरी चळवळीला बदनाम करण्याची मालिकाच जणू सुरू केली होती. नामदेव ढसाळ त्यावेळी मस्तवालपणे बाळ ठाकरेच्या 'यारीत' मश्गूल होता. बाळ ठाकरेचे गोडवे गात होता. 2004 साली काँग्रेसी मंत्री मणिशंकर अय्यर यांनी सावरकर विरोधात केलेल्या एका विधानावर बाळ ठाकरेनी 'जोडे मारो आंदोलन' घेतलं, तेंव्हा ज्वलंत हिंदुत्वाच्या पुरस्कार करणाऱ्या 'सामना' मध्ये नामदेव ढसाळने 'सर्व काही समष्टी साठी' या आपल्या सदरात अय्यरला उद्देशून _'या कावळ्याला सावरकर काय कळणार! (२१ ऑगस्ट २००४)'_ असा प्रदिर्घ लेख लिहून सावरकराचा 'उदो-उदो' केला. विशेष म्हणजे सावरकराची तळी उचलुन धरण्याच्या नादात त्याची ती 'ब्राह्मणी जगाच्या त्रिखंडात' गाजलेली मार्सेलीस बंदर लगतची 'पाण-ऊडी' गौरांकित करण्यासाठी _"...काचेने कापलेल्या सर्वांगात जखमा होवून सावरकरांनी मार्सेलीसचा किनारा गाठला..."_ अशी फेकम-फाक करण्यासही ढसाळ अजिबात कचरला नाही. सावरकर भक्त संघी आशीष शेलारला हा ब्राह्मणी नामदेव ढसाळ भावला नसता तर नवलंच.
शंकराचार्यला चप्पल फेकून मारणाऱ्या नामदेव ढसाळची तुलना कट्टर हिंदुत्ववादी जनसंघ संस्थापक दीनदयाळ उपाध्याय बरोबर केली म्हणुन घायाळ झालेले साहित्यिक, कलावंत अन कार्यकर्ते हे सर्व एकजात एव्हढे विसरभोळे कसे की, 30 ऑगस्ट 2006 रोजी दिल्लीत RSS च्या कार्यक्रमात नामदेव ढसाळने आदि शंकराचार्यची खुलेआम जाहिर तारिफ करत, शंकराचार्यची खंडित परांपरा पुनः जोमाने सुरू करणं गरजेचं असं प्रतिपादन केलंय, हे देखिल ही मंडळी विसरलीय. नामदेव ढसाळच्या कौतुकास पात्र ठरलेला हा आदि शंकराचार्य म्हणजे भारतातून बौद्ध धम्माची पिछेहाट करण्यास कारणीभूत ठरलेलं पात्रं होय हे ही इथे विशेष नमूद करावंसं वाटतं, विसरभोळ्या नामदेव प्रेमींसाठी.
जातींचा नायनाट करून समाजात 'समता' आणण्यासाठी बाबासाहेबांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं तर याविरोधात जातीय उतरंडीच्या पायऱ्या आहे तशाच शाबूत ठेवत हिंदू धर्मात 'समरस' होवून राहण्यासाठी RSS ने 'सामाजिक समरसता मंच' नावानं डाव रचला. नामदेव ढसाळनी सदर कार्यक्रमात RSS च्या सामाजिक समरसतेला उचलून धरत तब्बल तासभर त्यावर रवंथ केलं. 'बौद्ध धम्माला हिंदू धर्मापासून वेगळं पाहू नये' अशी मुक्ताफळं उधळत, नामदेव ढसाळनी बाबासाहेबांच्या बौद्ध धर्मांतराची अवहेलना करण्याचं पुण्यही RSS च्या साक्षीनं पदरात पाडून घेतलं तर, 'फक्तं RSS हेच जातिअंत करण्यास कटिबध्द आहे.. सोशलिस्ट अन कम्युनिस्ट जातिअंताबद्दल निव्वळ बोलघेवडेपणा करतात' अशा आशयाची मांडणी करत RSS ला गोंजरायचं काम ही त्यानं लीलया पेललं. 'RSS च्या स्टेजवर आलो म्हणून कम्युनिस्ट मित्रमंडळी नाकं मुरडतील, शिव्या घालतील पण मला काही फरक पडत नाही.. मी राष्ट्रीय एकता अन सामाजिक अखंडता राखण्यासाठी RSS सोबत आलोय', अशी लाजिरवाणी पकवा-पकवी करण्यास ही नामदेव ढसाळने आढेवेढे घेतले नाहीत. ढसाळनी RSS वर उधळलेल्या स्तुतीसुमनांची रसभरीत वर्णनं RSS च्या 'पांचजन्य' सह इत्तर वृत्तपत्रांनी रकानेच्या रकाने भरून प्रसिद्ध केलीत त्यावेळी.
असा नामदेव ढसाळ जो टोट्टली RSS धार्जिणा होता, त्याची तुलना जनसंघ संस्थापक दीनदयाळ उपाध्याय बरोबर केली म्हणून त्याचा ~चाहता~ भक्त वर्ग जाम चिडलाय अन त्यांनी संघी आशीष शेलारनी माफी मागावी म्हणून मोर्चा उघडलाय. अर्थातच शेलारनी सदर मागणी धुडकावून लावलीय. विशेष गंमत म्हणजे या आघाडीचे संपर्क प्रमुख म्हणून काॅम्रेड सुबोध मोरे व सुरुवातीला काॅम्रेड मग गांधी-आंबेडकर समन्वय साधण्याची अत्यंतिक गरज सांगणारा 'काँग्रेसी जयभीम वाला' तद्नंतर 'भारिपवाला रिपब्लीकन' मग 'रामदासी रिपब्लीकन' मग 'काँग्रेस ने बाबासाहेबांना फसवलंय' ही सबब पुढे करत रामदास सोबत मातोश्री गाठलेला भीमसैनिक अन सध्या रामदासला सोडून उबाठा वाला 'भीमशक्ती सैनिक' असलेला थोर साहित्यिक अर्जुन डांगळे हे दोघे होय. बाबासाहेबांचे अत्यंत जवळचे कम्युनिस्ट सहकारी काॅम्रेड आर. बी. मोरे यांचा समृद्ध आणि धीटपणाचा वारसा लाभलेला सुबोध असा का वागतोय याचा बोध होण्यास काहीच मार्ग नाही. अर्जुन डांगळे म्हणजे एक धम्मालंच प्रकार. आज जर उद्धव ठाकरे भाजपा सोबत असते तर अर्जुन डांगळे स्टेजवर आशीष शेलारच्या अगदी मंडीला मांडी लावुन बसले असते अन नामदेव ढसाळची बरोबरी दीनदयाळ उपाध्यायशीच कशाला वाजपेयी बरोबरही खुशाल करून टाकली असती अगदी अलंकारिक भारदस्त भाषेत.. असो.
मुद्दा नामदेव ढसाळला 'आंबेडकरी' असं प्रशस्तीपत्र देणाऱ्या साहित्यिक, कलावंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा आहे. या 'विद्वान' मंडळींच्या भूमिकेतून खालील महत्वाचे प्रश्न उपस्थित होतात: नामदेव ढसाळ, रामदास आठवले, अर्जुन डांगळे सारखी कधीही कुठंही घरंगळत जाणारी प्रबोधनकारांच्या भाषेतील 'बिनबुडाची पिचकी गाडगी' जर 'आंबेडकरी' आहेत तर मग स्वतः बाबासाहेबच 'गैर-आंबेडकरी' ठरतात.. याचं काय? तरुणांनी बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून चळवळ चालवावी की नामदेव, अर्जुन, रामदास इत्यादि सारख्या बेईमानांची 'री' ओढत, धर्मांध शक्तींशी साटंलोटं करूनही या विद्वानांच्या व्याख्येत बसणारा 'आंबेडकरी' म्हणून मिरवत समाजद्रोह करावा?? _'या देशात हिंदू राज येणं हे या देशावरील सर्वात मोठं अरिष्ट असेल..म्हणून काहीही , अगदी काहीही करा पण हिंदू राज येवू देवू नका !'_ अशी सक्त ताकीद देणारे बाबासाहेब अन व्यक्तिगत स्वार्थासाठी हिंदुत्ववादी पक्षांबरोबर शैय्यासोबत करत 'हिंदू राज' आणण्यास मोलाचा हातभार लावणारे टिनपाट छाप नेते यांना एकत्र बसविणारा या विद्वानांचा 'वैचारिक व्यभिचार' समाज असा मुकाटपणे का सहन करत राहतोय???
- मिलिंद भवार... _पँथर्स_ (23 एप्रिल 2025)
- 9833830029
*जाता जाता:* पुनर्विकासाच्या नावाखाली कामाठीपुराला नवीमुंबईत हलविण्यात येणार आहे. नवीमुंबईतील या नव-कामाठीपुराला 'नामदेव ढसाळ नगरी' असं नामकरण करण्याचं सूतोवाच करून संघी आशीष शेलारने दाखवून दिलंय की दलितांनी कितीही RSS चं बुड चाटलं तरी त्यांची 'जागा' तीच.. जातीव्यवस्थेनं ठरवलेली.. सर्वात खालची. मुंबईतून कामाठीपुरा बाहेर हलविल्यानंतर मुंबईत आयत्या उपलब्ध होणाऱ्या रिकाम्याजागी ज्या टोलेजंग पॉश उच्चभ्रू सोसायट्या उभ्या राहणार त्यांना मात्र नामदेव ढसाळचं नाव देण्याची कल्पना शेलार च्या मनाला शिवली देखिल नाही. RSS च्या कच्छपी लागलेल्या दलितांनी यातून योग्य तो बोध घेण्यास हरकत नाही.
0 टिप्पण्या