१८७५ मधील डेक्कन रायट्स किंवा दख्खनचा उठाव ही सहकार चळवळीची मुहुर्तमेढ ठरली गेली. ज्या सावकारी यंत्रणेच्या कचाटयातून शेतकऱ्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकारी संस्थांचा उदय झाला. त्या सावकारी यंत्रणेविरुध्द दि. १२ मे १८७५ रोजी पुणे-नगर रस्त्यावरील 'सुपे' या गावी आंदोलनाचा भडका उडाला. सावकरांवर हल्ले झाले. त्यांची घरे व हिशोबाची पुस्तके जाळण्यात आली. 'दख्खनचा उठाव' म्हणून इतिहासात प्रसिध्द असलेल्या या घटनेला दि. १२ मे २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधत राज्य बँकेने "सहकाराचे सक्षमीकरण आणि राज्य शासनाचे धोरण " या विषयावर परिसंवाद आयोजित केला आहे. सोमवार दि. १२ मे रोजी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई. येथे होणाऱ्या या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार, अजित पवार (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य), नितिन गडकरी (केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री), एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) हे मान्यवर उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहेत, अशी माहिती विद्याधर अनास्कर, (प्रशासक-दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबई) यांनी दिली आहे.
ब्रिटिश अमदानीत देशात काही सामाजिक सुधारणा झाल्या, दळणवळणाची साधने निर्माण झाली, वस्तुविनिमय जाऊन चलन-विनिमयाची व्यवस्था रूजली. शेतकऱ्यांना अन्य प्रांतातील घडामोडींचे ज्ञान मिळू लागले आणि त्यातून आपल्या मागण्यांबद्दल शेतकरी जागृत झाला. यादरम्यान फ्रेंच राज्यक्रांतीने जगभरातील कष्टकऱ्यांना स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा एक अत्यंत प्रेरणादायी संदेश दिला होता. चीनमध्ये ⇨ माओ-त्से-तुंग यांनी उभारलेली शेतकरी-कष्टकऱ्यांची चळवळ भारतासारख्या अनेक वसाहतींसाठी एक वस्तुपाठ ठरली. परिणामी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात देशाच्या विविध भागांत शेतकरी चळवळीने आकार घ्यायला सुरुवात केली होती. त्यातूनच देशातील पहिली शेतकरी संघटना पंजाबमध्ये उदयास आली. शहीद भगतसिंग यांचे चुलते सरदार अजितसिंग संधू यांच्या नेतृत्वाखाली पंजाबचे शेतकरी एकत्र आले. अजितसिंग यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन उभे राहतानाच बिटिशांविरूद्घ लढ्याचे रणशिंग फुंकले आणि १९०७ मध्ये त्यांना मंडाले तुरूंगात पाठविण्यात आले.जलंदर जिल्ह्यातील खाटकरकालान येथे जन्मलेले अजितसिंग तुरूंगवासातून बाहेर आल्यानंतर १९४६ पर्यंत देशाबाहेर राहिले. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशी ते भारतात परत आले व त्याच दिवशी त्यांचे निधन झाले. १९०७ मध्येच जातीच्या आधारावरील ‘ जाट महासभा ’ ही संघटना स्थापन झाली, तीत बहुसंख्य शेतकरी होते;तथापि तिची ओळख शेतकऱ्यांऐवजी जाट समुदायाची संघटना अशीच राहिली. त्याचदरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढणाऱ्या राजा महेंद्र प्रताप यांनी गदर पार्टीच्या माध्यमातून, अमेरिका आणि कॅनडामध्ये एकोणिसाव्या शतकात स्थायिक झालेल्या शिखांनी मायभूमीत परत यावे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी संघर्ष करून ब्रिटिश सत्ता हुसकावून लावण्याचे प्रयत्न जारी ठेवावेत, असे आवाहन केले. त्या आवाहनालाअनुकूल प्रतिसाद देत जे लोक परत आले, त्यामध्ये आठ हजारांहून अधिक शीख होते. गदर पार्टीच्या माध्यमातून झालेल्या शेतकऱ्यांच्या चळवळीचा पंजाबच्या राजकारणावर प्रचंड प्रभाव राहिला.
हिंदू , मुस्लिम, शीख अशा सर्वच शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या संघटनेने विसाव्या शतकाच्या पहिल्या चार दशकांमध्ये लाहोर, फैसलाबाद, ल्यालपूर अशा अनेक ठिकाणी शेतकरी परिषदा भरविल्या. त्यांत शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यात आला. १९०७ मधील ल्यालपूर शेतकरी मेळाव्यात ‘ पगडी संभाल ओ जट्टा ’ ही शेतकऱ्याला स्वाभिमानाची शिकवण देणारी देशातील शेतकरी आंदोलनाची पहिली घोषणा दिली गेली. १९३८-३९ मधील लाहोर येथील प्रसिद्घ लॉंग मार्चने (मोर्चाने) असेंब्ली इमारतीला तब्बल नऊ महिने वेढा घातला होता. नेतृत्व संघटनेची बांधणी आणि राष्ट्रीय परिणाम या परिमाणांनुसार एकोणिसावे शतक संपतासंपता पंजाबमध्ये स्थापन झालेली संघटना देशातील पहिली असली, तरी प्रत्यक्षात पहिले मोठे आंदोलन मात्र महाराष्ट्रात झाले.
दीडशे रूपयांच्या कर्जापायी काळूराम सावकाराने पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील करडे गावातील प्रतिष्ठित शेतकरी बाबासाहेब देशमुख यांची शेतीवाडी, स्थावर व जंगम मालमत्ता जप्त केली. सततच्या दुष्काळा-नंतरही ब्रिटिश सरकारने शेतसारा कमी न केल्याने त्याचे हप्ते भरण्यासाठी शेतकऱ्यांना सावकाराचे उंबरठे झिजवावे लागत होते. सावकार व सरकार या दोघांनी संगनमताने ही लूट चालविल्याने पुणे, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने उठाव केला. त्याला अमुक एक असे नेतृत्व नव्हते. करडे येथील घटनेची प्रतिकिया म्हणून ९ सप्टेंबर १८७५ रोजी पहिला संघर्ष झाला. एका अर्थाने हे अहिंसक आंदोलन होते.१८७५ मधील डेक्कन रायट्स किंवा दख्खनचा उठाव हे ते पहिले आंदोलन होय. सावकारी पाशामध्ये अडकलेल्या मात्र ब्रिटिश धोरणाचे बळी ठरलेल्या शेतकऱ्यांची अधिकाधिक पिळवणूक या काळामध्ये होत राहिली. मात्र सामान्य शेतकऱ्यांना ब्रिटिशांच्या धोरणाची कल्पना नसल्यामुळे त्यांनी आपल्या संघर्षात्मक मोर्चा सावकारांकडे वळवला. सावकारांच्या घरावर हल्ले करून आपली शेतीवाडी, जमीनजुमल्याची गहाणखते, कागदपत्रे काढून सार्वजनिक ठिकाणी जाळायची; परंतु माणसांना अजिबात इजा करायची नाही, असे या उठावाचे स्वरूप होते.
0 टिप्पण्या