मनोहर भिकाजी चिटणीस, कोकणातील सिंधुदुर्ग (रायगड) जिल्ह्यातील मुरुड जंजीरा गावचे; वडील भिकाजी विनायक व आई भागीरथी यांचे सुपुत्र. १४ नोव्हेंबर १९०७ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांनी प्रारंभिक शिक्षण मुरुड इथेच घेतले. ते पुढील शिक्षणासाठी मुंबईत दाखल झाले. १९३४ साली इंग्रजी व मराठी विषय घेऊन मुंबई विद्यापीठात एम.ए.ला दुसरे आले. शिक्षकीपेशाच्या आवडीतून, १९३६ साली मुंबईतील, 'किंग जॉर्ज' या इंग्रजी शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. याच कालावधीत इंदुमती यांच्याशी त्यांचा विवाह झाला. पुढे मुंबईतील 'खालसा महाविद्यालयात' ते मराठीचे अधिव्याख्याता म्हणून रुजू झाले.
आंबेडकरी चळवळीतील बिन्नीचे शिलेदार म्हणून परिचित असलेले, कमलाकांत वासूदेव चित्रे हे चिटणीसांचे मामा. त्यांच्या माध्यमातून चिटणीसांंना बाबासाहेबांचा सहवास लाभला व तो पुढे कमालीचा वृद्धिंगत झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९४५-४६ साली 'पिपल्स् एज्युकेशन सोसायटीची' स्थापना केली. बाबासाहेबांच्या त्या कष्टप्रद कार्यात, चिटणीसांचे योगदान महत्वपूर्ण होते. त्या संस्थेच्या अंतर्गत बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या; मिलिंद (औरंगाबाद) आणि सिद्धार्थ (मुंबई) या महाविद्यालयांमध्ये चिटणीसांनी विद्यादानाबरोबरच, सदर महाविद्यालयांच्या व्यवस्थापणातही लक्षणीय कार्य केले. शैक्षणिक कार्यातील व्यवस्थापनात नव्या विचारांचे रोपन व्हावे म्हणून त्यांनी अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, इटली आदी देशांमध्ये अभ्यास दौरे केले. औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयाचे पहिले मराठी विभाग प्रमुख , पहिले प्राचार्य आणि पुढे मराठवाडा विद्यापीठाचे पहिले रजिष्ट्रार म्हणून, त्यांनी केलेले कार्य हे प्रशंंसनीय व प्रेरणादायी होते.बाबासाहेबांच्या अनेक ग्रंथांची मुद्रिते तपासणे आणि त्यांना गरजेनुसार दुर्मिळ संदर्भ ग्रंथ उपलब्ध करून देणे, या संदर्भाने चिटणीसांनी केलेलं कार्य मूलभूत होतं. भारताची फाळणी(१९४०) काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांंसाठी काय केले ? (१९४५) शुद्र पूर्वी कोण होते ? (१९४६) या तिन्ही इंग्रजी ग्रंथांच्या प्रस्तावनेत बाबासाहेबांनी चिटणीसांच्या उपरोक्त कार्याचा सन्मानपूर्वक उल्लेख केलेला दिसून येतो. आंबेडकरी चळवळीच्या गरजेतून त्यांनी काही काळ 'प्रतिष्ठान' शिर्षक असलेले मासिक देखील चालविले. त्यांच्या चिंतनाचा व अभ्यासूव्रुतीचा लाभ मिळावा म्हणून म. राज्य मेडिकल कौन्सिलने आणि आँल इंडिया रेडिओने त्यांची सल्लागार म्हणून नेमणूक केलेली होती. त्या समित्यांवरील त्यांचे कार्य व महत्वपुर्ण सल्ले लोकाभिमुख स्वरूपाचे होते. चिटणीस यांचे इंग्रजी आणि मराठी भाषेवर प्रभुत्व होते. बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर १९७० साली बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा सुलभ मराठीत अनुवाद करण्यात आला. घन:श्याम तळवटकर आणि शा. शं. रेगे यांच्या सहकार्याने, चिटणीसांनी प्रंचड बौद्धिक श्रम देऊन सदर अनुवादाचे कार्य पार पाडले होते.
प्राचार्य चिटणीस सर हे सिध्दहस्त लेखकही होते. त्यांनी १९५५ साली लिहिलेले ' युगयात्रा ' हे नाटक आंबेडकरी चळवळीला उर्जा देणारे ठरले. २० नोव्हेंबर १९५५ रोजी मिलींद महाविद्यालयात पस्तुत नाटकाचा प्रयोग बाबासाहेबांच्या उपस्थितीत संपन्न झाला होता. त्या नाटकाचा तिसरा प्रयोग १४ आँक्टोबर १९५६ रोजी, नागपूर येथील भव्य पटांगणावर संपन्न झाला होता. 'धम्म दीक्षा' सोहळ्याच्या निमित्ताने सादर केलेले ते नाटक बाबासाहेब आणि माईसाहेब आंबेडकर यांच्यासह, पाच ते सहा लाख प्रेक्षकांनी एकाचवेळी पाहिले होते. प्रंचड समुदयाने पाहिलेला तो जगातील एकमेव नाट्यप्रयोग असावा. कथित रामायणकाळ ते आंबेडकर काळापर्यंतच्या, अस्पृश्यांच्या स्थितीचे वर्णन त्या नाट्यकृतीतून प्रक्षेपित केलेलं होत. महाड सत्याग्रहावर आणि संबंधित स्मृतींवर आधारलेली 'जिवंत झाल्या साऊल्या ' या एकांकिकेचे प्रा. म. भि.चिटणीस यांनी लेखन केले होते. अस्पृश्यांच्या उध्दारासाठी बाबासाहेबांनी आरंभलेल्या शैक्षणिक कार्यातील, चिटणीस यांचे योगदान उल्लेखनिय आहे. पी. ई. एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग बोर्डावर त्यांनी विविध प्रकारचा पदभार कसोशीने सांभाळला होता. आंबेडकरी जाणिवा विद्यार्थ्यांमध्ये द्रुढ करण्यासाठी, त्यांनी आपले आयुष्य वेचले.
त्यांच्या विषयी, मिलिंद महाविद्यालयाचा एक विद्यार्थी मनोगत व्यक्त करताना म्हणतो की,मराठी विभागात कॉलेजचे प्राचार्य म.भि. चिटणीस होते. त्यांनी मला मराठी वाङ्मयाची गोडी लावली. त्यांचं वैशिष्ट्ये असं की, अभ्यासक्रमांच्या बाहेरचं ते बोलत. अभ्यासक्रम महत्त्वाचा नाही. म्हणजे उदा. नवकथा आणि नवकवितेची ओळख १९५० साली चिटणीसांमुळे झाली. वर्गामध्ये ते नेहमी मर्ढेकर, गंगाधर गाडगीळ, माडगूळकर यांचे संदर्भ देत. त्यांची वैशिष्ट्यं सांगत. म्हणजे अभ्यासक्रमाशी संबधित नसलेलंच असं चालत असे. मला वाचनाची खूपच गोडी होती. तेव्हा त्यांनी एखादा पुस्तकाचा संदर्भ दिला की, मी ग्रंथालयात जाऊन ते पुस्तक घेऊन वाचत असे. एकदा त्यांनी फ्रॉईडचा संदर्भ दिला. मग मी ग्रंथालयात गेलो, म्हणालो, ‘मला फ्रॉईडचे व्हॉल्युम पाहिजेत’. ग्रंथपाल म्हणाला, ‘बाळ, तू अजून लहान आहेस फ्रॉईडची पुस्तकं मी तुला देणार नाही.’ मग चिटणीससरांकडे गेलो. त्यांनी चिठ्ठी दिली- ‘याला फ्रॉईडचे खंड द्या’. मी ते वाचायचा प्रयत्न केला, पण तेव्हा ते काय कळणं शक्य नव्हतं.
पण ही गंमतजिज्ञासा. चिटणीसांचं असं होतं की, मराठीचे विद्यार्थी काय वाचतात यावर त्यांचं लक्ष असे. त्या काळात कार्ड असे. म्हणजे आम्ही पुस्तकं घेतलं, त्याची कार्डावर यादी असायची. मोठाल्या कार्डावर. ते कार्ड बघत. शिक्षक कसा असावा याचं चिटणीस आदर्श उदाहरण. त्यांचे फार मोठे संस्कार झाले. ते कर्ते सुधारक असल्याने १९५६ साली, त्यांनी बाबासाहेबांकडून 'बुध्द धम्म' अनुसरला. बाबासाहेबांंच्या पश्चातही ते आंबेडकरी विचार चळवळीत सक्रिय राहिले. महाराष्ट्र शासनाने बाबासाहेबांचे लेखन प्रकाशित करण्यासाठी गठित केलेल्या समितीत त्यांनी १९७६ ते ८२ या कालावधीत केलेले कार्य मूलगामी आहे. १९७३ साली मिलींद महाविद्यालयाचे प्राचार्य असताना वयाच्या ६५ व्या वर्षी सेवानिवृत्त झाले. त्या वयातही त्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या आंदोलनात स्वत:ला झोकून दिले. ते 'नामांतरवादी नागरिक क्रुती समितीचे' अध्यक्ष होते. सदर आंदोलनात अग्रभागी राहिल्याने त्यांना हर्सूलच्या कारागृहात तुरुंगवासही सोसावा लागला.
कुशल व्यवस्थापक, आदर्श शिक्षक, कर्तव्य कठोर प्राचार्य, साक्षेपी लेखक व अनुवादक, आंबेडकरनिष्ठ धुरीण, बौद्ध दर्शनाचे गाढे अभ्यासक आदी विशेषणांनी, चिटणीस यांच्या व्यक्तीत्त्वाची ओळख सजगांमध्ये प्रचलित आहे. ती वर्तमानातील पिढीसाठी देखील प्रेरक आहे. १९६७ साली मुंबई येथे संपन्न झालेल्या 'बौद्ध साहित्य संमेलना'चे ते अध्यक्ष होते. १९७२ साली म. शासनाने त्यांना 'दलित मित्र' व 'आदर्श शिक्षक' पुरस्काराने गौरविले होत.मराठवाडा साहित्य परिषदे मार्फत म भि चिटणीस मराठी वाज्ञ्गमय पुरस्कार प्रदान केला जातो. १९७४ व १९७७ साली औरंगाबाद आणि भुसावळ येथे संपन्न झालेल्या 'अस्मितादर्श' साहित्य संमेलनाचे ते उद्घाटक देखील होते. या महान समाज धुरीणाचे निर्वाण १३ नोव्हेंबर १९८३ रोजी औरंगाबाद येथे झाले.
0 टिप्पण्या