Top Post Ad

हा दोष त्यांना प्रचंड बहुमत देणाऱ्या मतदारांचा आहे

 धनंजय मुंडेंचा राजीनामा आरोप सिद्ध होईपर्यंत घेणार नाही हे अजितदादांचं विधान अत्यंत अनैतिक आहे. गुन्हा सिद्ध झाला तर नैतिक राजीनामा घेऊन तुम्ही लोकशाहीवर असा कोणता उपकार करणार? गुन्हा सिद्धच झाला तर कायद्यानं राजीनामा द्यावाच लागेल. लाल बहादूर शास्त्रींचं सोडा. त्यांचं नाव पण घेण्याची लायकी आजच्या राजकीय व्यवस्थेची नाही पण या महाराष्ट्रात काय कमी उदाहरणं आहेत? बॅ. अब्दुल रहेमान अंतुले (मुख्यमंत्री) यांच्यावर सिमेंट घोटाळ्याचा आरोप झाल्याबरोबर त्यांनी राजीनामा दिला. त्यांचा गुन्हा सिद्ध झाला होता का? बॅ. रामराव आदिकांवर (उपमुख्यमंत्री) एअर होस्टेसची छेडखानी केल्याचा आरोप झाला, त्यांनी राजीनामा दिला. गुन्हा सिद्ध झाला होता का? शिवाजीराव पाटील निलंगेकर (मुख्यमंत्री) यांच्यावर मुलीचे गुण परिक्षेत वाढवल्याचा आरोप झाला, त्यांनी राजीनामा दिला. गुन्हा सिद्ध झाला होता का? मनोहर जोशी (मुख्यमंत्री) यांच्या जावयाचं बांधकाम प्रकरण उजेडात आलं, त्यांनी राजीनामा दिला. त्यांचा गुन्हा सिद्ध झाला होता का? अगदी अलिकडे अशोकराव चव्हाण (मुख्यमंत्री) यांच्यावर आदर्शमध्ये आरोप झाला. त्यांनी राजीनामा दिला. गुन्हा सिद्ध झाला होता का? बबनराव घोलप, महादेव शिवणकर, शशिकांत सुतार, सुरेशदादा जैन यांनी आरोप झाल्यावर मंत्रीपदाचे राजीनामे दिले. त्यांचे गुन्हे सिद्ध झाले होते का? कधी? तेलगी प्रकरणी आरोप झाल्यावर भुजबळांना राजीनामा द्यावा लागला होता. गुन्हा सिद्ध झाला होता का?अगदी अलिकडे मविआ सरकारमधून अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्यावरचा गुन्हा सिद्ध झाला होता का?

सिंचन घोटाळ्याचे आरोप झाल्यावर प्रितीसंगमावर आत्मक्लेश करत स्वतः अजित पवारांनी नैतिक जबाबदारी घेत राजीनामा दिला होता. तेव्हा गुन्हा सिद्ध झाला असं दादांना मनोमन वाटलं होतं का? या राज्यात एक आरोपी इतका डाॅन होतो की पोलीस हात लावू शकत नाहीत, तो सरेंडर होऊन उपकार करतो. त्याचे मंत्र्यांशी थेट आर्थिक संबंध आणि व्यावसायिक संबंध उघडउघड दिसतात, त्याची सर्वांशी जवळीक खालील फोटोतून जनतेला दिसते तरी गुन्हा सिद्ध होईपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही असं दादा म्हणतात? वा रे नैतिकता आणि वा रे लोकशाही! नैतिक आधारावर राजीनामा हे तुमचे जनतेवर उपकार नसतात. एखाद्याचे लागेबांधे जगजाहीर झाल्यावर चौकशी यंत्रणा आणि न्याय यंत्रणेवर बलाढ्य मंत्री दबाव आणू शकतो आणि त्यातून पिडीताला न्याय मिळत नाही म्हणून राजीनामा घ्यायचा असतो. बाहुबलीच्या भुजेतलं राजकीय बळ काढल्याशिवाय सामना बरोबरीचा होणार नाही आणि न्यायही मिळणार नाही म्हणून राजीनामा घ्यायचा असतो. अर्थात दादा, फडणवीस, शिंदे, मुंडे यांनी आता नैतिकतेच्या व्याख्याच बदलल्या असतील तर तो त्यांचा दोष नाही. त्यांना प्रचंड बहुमत देणाऱ्या मतदारांचा आहे असं मला वाटतंय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com