महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीच्या दरात तब्बल १४.९५ टक्के भाडेवाढ लागू केल्याने राज्यभर संताप व्यक्त करण्यात येत आहे. ही दरवाढ रद्द करून परिवहन मंत्र्यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेमधून खात्याची सुधारणा करावी अशी मागणी करत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले. ही दरवाढ रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संतप्त शिवसैनिकांनी दिला.
लोकसभा, विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव रखडला होता. परिणामी एसटीला दर महिन्याला तीन कोटींचा तोटा सहन करावा लागला असल्याचे परिवहन मंत्र्यांनी सांगितले. एकीकडे लाडकी बहिण योजनेच्या नावावर मते विकत घेणाऱ्या सरकारकडून ही दरवाढ म्हणजे सामान्य प्रवाशांच्या डोळ्यात धुळफेक केली जात असल्याचा आरोप आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांनी केला आहे. डिझेल, चेसी, टायर यांसारख्या घटकांच्या वाढलेल्या किमती अन मागील काळात कर्मचार्यांच्या पगारात झालेली वाढ यामुळे एसटी तोट्यात गेली असून हा तोटा भरून काढण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेमधून वसूल करावा अशी मागणी जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी केली. त्यावेळी संपर्क प्रमुख नरेश मणेरा, जिल्हाप्रमुख केदार दिघे, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, संजय तरे, उपजिल्हा प्रमुख कृष्णकुमार कोळी, सुनील पाटील, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपशहर प्रमुख वासुदेव भोईर, सचिन चव्हाण, प्रदीप शेडगे, वसंत गवाळे, प्रवक्ते अनिश गाढवे, संजय दळवी, महिला शहर संघटक प्रमिला भांगे, सुनंदा देशपांडे, संगीता साळवी, महेश्वरी तरे, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ईडी सरकार हाय हाय, एसटी भाडेवाढ रद्द करा.....प्रवासी उपाशी परिवहन मंत्री तुपाशी...या आशयाचे फलक हातात घेऊन शिवसैनिकांनी आज खोपट येथील एसटी डेपो मध्ये चक्काजम आंदोलन केले. या फलक विशेष लक्ष वेधून घेत होते. सर्वसामान्यांच्या माथ्यावर लादलेली दरवाढ त्वरित रद्द करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
0 टिप्पण्या