ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात असलेले मौजे शिळगावात एका ३० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी ९ जुलै २०२४ रोजी उघडकीस आली. मौजे शिळगावातील घोळ गणपती मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी एका विवाहितेवर सामूहिक अत्याचार करुन हत्या केल्याची ही घटना घडली आहे. सदर घटनेतील आरोपीना उचित शिक्षा व्हावी याकरीता विशेष सरकारी अभियोक्त्याची नियुक्ती करावी.अशी मागणी यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली होती. त्यानुसार याप्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करुन हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा. तसेच या प्रकरणी विशेष सरकारी वकिल म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे, नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि गृह विभागाचे प्रधान सचिव यांना दिल्या.
ही अत्यंत गंभीर घटना असून याप्रकरणी ठाणे आणि नवी मुंबई पोलीसांकडे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घटना शिळफाटा, ठाणे येथे घडली असून तेथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबरोबरच महिलेच्या आई-वडिलांच्या तक्रारीवरुन नवी मुंबई पोलीसांकडे ४९८ ए कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास चांगल्या पद्धतीने आणि जलदगतीने करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.महिलेवर सामूहिक अत्याचार आणि तिची हत्या करणाऱ्या दोषींना कठोरात कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने या प्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येईल. तसेच या प्रकरणी विशेष सरकारी वकिल म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी ठाणे पोलीस आयुक्त आणि गृह विभागाचे प्रधान सचिव यांना दिल्या आहेत.या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा होईल यादृष्टीने या प्रकरणी कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
काय आहे नेमकी घटना?
घरगुती भांडण झाल्याने एक विवाहित तरुणी डायघर जवळील शीळ फाटा गणेश घोळ या मंदिरात मनःशांतीसाठी आली होती. मंदिराचे मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर प्रदेश इथं आपल्या गावी गेल्याने काही दिवस गणेश घोळ यांनी मंदिर सांभाळण्यासाठी श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या तीन पुजाऱ्यांना गावाहून बोलावून घेतलं होतं. पीडित महिला ही बेलापूर इथं राहाणारी आहे. घरात कौटुंबिक वाद सुरु असल्याने ती 6 जुलैला ती शिळ फाटा रोडवरच्या गणेश घोळ मंदिरात सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आली. दिवसभर ही महिला त्याच मंदिरात बसल्याने मंदिरातील पुजाऱ्यांनी तिला दुपारचे जेवण दिलं. त्यानंतर संध्याकाळचा चहा देताना या चहा मध्ये भांगेची गोळी मिसळून दिली. चहा प्यायला नंतर महिलेची शुद्ध हरपली. त्यानंतर रात्रभर ही महिला या मंदिरातच होती. रात्रीच्या वेळी मंदिरातील श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या तीन पुजाऱ्यांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. पहाटे शुद्ध आल्यानंतर या महिलेच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.
महिला आरडाओरडा करत असल्याने आपलं बिंग फुटेल या भितीने पुजाऱ्यांनी तिला मारहाण करत जमिनीवर आपटलं, यातच त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर महिलेचा मृतदेह त्यांनी मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला. दोन दिवसांनी मंदिरात गेलेल्या एका भाविकाला डोंगरावर जंगलात पडलेला महिलेचा मृतदेह दिसला. त्याने याची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत तपास सुरु केला. परिसरातील सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांना गणेश घोळ मंदिरातील पुजाऱ्याचा संशय आला. पुजाऱ्यांना चौकशी केली असता त्यांनी या घटनेची कबुली दिली. पोलिसांनी संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या दोघांना अटक केली. मात्र तिसरा आरोपी श्यामसुंदर शर्मा हा तिथून फरार झाला. पोलिसांनी आपली सूत्रे हलवत शर्मा याला ट्रॉम्बे इथळ्या चिता कॅम्प परिसरातून अटक केली. श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा, राजकुमार पांडे या तीनही आरोपींना अटक करण्यात आलीय. ठाणे कल्याण डोंबिवली सह समस्त ठाणे परिसरातील प्रसिद्ध असणाऱ्या गणेश घोळ परिसरात ही अत्यंत धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
0 टिप्पण्या