*ठाणे जिल्ह्यातील शिळगावात महिलेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींना उचित शिक्षा व्हावी याकरीता विशेष सरकारी अभियोक्त्याची नियुक्ती करावी- डॉ. नीलम गोऱ्हे*
ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात असलेले मौजे शिळगावात एका ३० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी ९ जुलै २०२४ रोजी उघडकीस आली. मौजे शिळगावातील घोळ गणपती मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी एका विवाहितेवर सामूहिक अत्याचार करुन हत्या केल्याची ही घटना घडली आहे. सदर घटनेतील आरोपीना उचित शिक्षा व्हावी याकरीता विशेष सरकारी अभियोक्त्याची नियुक्ती करावी.अशी मागणी यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा.ना.श्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.
महिलांना सर्व क्षेत्रात प्राधान्य देणे व त्यांचा सर्वांगीण विकास साध्य करणे हे या सरकारचे धोरण आहे. अशा परिस्थितीत सदरील घटना या स्त्रियांच्या मनोधैर्यावर विपरीत परीणाम करु शकतात. मंदिर परिसरात आरोपींनी एका विवाहीत महिलेवर सामूहिक अत्याचार केले. ही घटना अत्यंत लाजीरवाणी व माणुसकिला काळीमा फासणारी असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी म्हंटले आहे. अशा घटना भविष्यात्त घडु नये याकरीता राज्यातील सर्व मंदिरे, प्रार्थनास्थळे येथे सीसीटीवी बसविण्यात यावे व तेथील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करावी. धार्मिक स्थळामध्ये कार्यरत सर्व कर्मचारी, पुजारी व ईतर पूर्णवेळ सेवक यांची नजीकच्या पोलीस स्टेशन मार्फ़त चारित्र्य पडताळणी करण्यात यावी. तसेच महिलेचे आप्त व कुटुंबियाना मानसोपचार सेवा व समुपदेशन पुरविण्यात यावे. व सदर घटनेतील आरोपीना उचित शिक्षा व्हावी याकरीता विशेष सरकारी अभियोक्त्याची नियुक्ती करावी.अशी सूचना यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्राद्वारे केली आहे.:.
काय आहे नेमकी घटना?
घरगुती भांडण झाल्याने एक विवाहित तरुणी डायघर जवळील शीळ फाटा गणेश घोळ या मंदिरात मनःशांतीसाठी आली होती. मंदिराचे मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर प्रदेश इथं आपल्या गावी गेल्याने काही दिवस गणेश घोळ यांनी मंदिर सांभाळण्यासाठी श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या तीन पुजाऱ्यांना गावाहून बोलावून घेतलं होतं. पीडित महिला ही बेलापूर इथं राहाणारी आहे. घरात कौटुंबिक वाद सुरु असल्याने ती 6 जुलैला ती शिळ फाटा रोडवरच्या गणेश घोळ मंदिरात सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आली. दिवसभर ही महिला त्याच मंदिरात बसल्याने मंदिरातील पुजाऱ्यांनी तिला दुपारचे जेवण दिलं. त्यानंतर संध्याकाळचा चहा देताना या चहा मध्ये भांगेची गोळी मिसळून दिली. चहा प्यायला नंतर महिलेची शुद्ध हरपली. त्यानंतर रात्रभर ही महिला या मंदिरातच होती. रात्रीच्या वेळी मंदिरातील श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या तीन पुजाऱ्यांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. पहाटे शुद्ध आल्यानंतर या महिलेच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.
महिला आरडाओरडा करत असल्याने आपलं बिंग फुटेल या भितीने पुजाऱ्यांनी तिला मारहाण करत जमिनीवर आपटलं, यातच त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर महिलेचा मृतदेह त्यांनी मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला. दोन दिवसांनी मंदिरात गेलेल्या एका भाविकाला डोंगरावर जंगलात पडलेला महिलेचा मृतदेह दिसला. त्याने याची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत तपास सुरु केला. परिसरातील सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांना गणेश घोळ मंदिरातील पुजाऱ्याचा संशय आला. पुजाऱ्यांना चौकशी केली असता त्यांनी या घटनेची कबुली दिली. पोलिसांनी संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या दोघांना अटक केली. मात्र तिसरा आरोपी श्यामसुंदर शर्मा हा तिथून फरार झाला. पोलिसांनी आपली सूत्रे हलवत शर्मा याला ट्रॉम्बे इथळ्या चिता कॅम्प परिसरातून अटक केली. श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा, राजकुमार पांडे या तीनही आरोपींना अटक करण्यात आलीय. ठाणे कल्याण डोंबिवली सह समस्त ठाणे परिसरातील प्रसिद्ध असणाऱ्या गणेश घोळ परिसरात ही अत्यंत धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
0 टिप्पण्या