मुंबई, राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील मोठ्या उद्योगपतींची बैठक घेऊन त्यांना संभाव्य तिसऱ्या लाटेत उद्योग सुरु ठेवण्याच्यादृष्टीने करावयाच्या तयारी संदर्भात मार्गदर्शन करावे, ज्या उद्योजकांना त्यांच्या उद्योगाच्या आवारात कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे तिथे त्यांनी त्याचे वेळीच नियोजन करावे व ज्या उद्योजकांना ते शक्य नाही त्यांनी कंपनीच्या आसपासच्या परिसरात अशी जागा शोधून कामगारांची तिथे राहण्याची (फिल्ड रेसिंडन्स) व्यवस्था करावी, त्यादृष्टीने त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक असलेले सहकार्य करावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस अधिकाऱ्यांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे चर्चा करून मुख्यमंत्र्यांनी कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, कोरोनासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्कफोर्सचे पदाधिकारी, बाल टास्कफोर्सचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
आता पावसाळा आहे, या काळात साथीचे इतर आजार उदभवतात त्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव आहे. याच काळात आपले सण, समारंभही सुरु होतात. ही सगळी परिस्थिती अतिशय काळजीपूर्वक हाताळण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी जिल्हानिहाय ऑक्सिजनच्या तयारीचाही आढावा घेतला त्यांनी ऑक्सिजन निर्मिती, ऑक्सिजन साठा आणि रुग्णसंख्या वाढल्यास करावयाची पूर्वतयारी या सर्वच प्रक्रियेला वेग देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या.
कोरानामुक्त गावांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंचांची बैठक घेऊन गाव कोरोनामुक्त होईल याची दक्षता घ्यावी, वस्ती केंद्रीत करून गाव कोरोना मुक्त करावे अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या बैठकीत विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना सांगितल्या तसेच तिसऱ्या लाटेला परतवून लावण्यासाठी केलेली तयारीही सांगितली तेंव्हा कोरोनाला हरवण्याची तुमची जिद्द कौतुकास्पद आहे ती कायम ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, कोरोना उपचाराच्या दरासंदर्भात आरोग्य विभागाने खासगी रुग्णालयांसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याचे पालन होत असल्याची काळजी जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी, यासाठी ऑडिटर्सची नियुक्ती करावी, कंटेन्मेंट झोन संदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, लसीचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्यावी, ज्यांनी पहिला डोस घेतला आहे ते नागरिक दुसरा डोस घेतील हे पहावे, महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचा जिल्हाधिकाऱ्यांनी दर पंधरा दिवसांनी नियमित स्वरूपात आढावा घ्यावा अशा सूचनाही त्यांनी केल्या. या बैठका नियमित झाल्यास दाव्यांचे निकाली निघण्याचे प्रमाण वाढून नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. श्री.टोपे यांनी सर्व जिल्ह्यांनी फायर, स्ट्रक्चरल आणि इलेक्ट्रिकल करण्याच्या सुचनेचा पुनरूच्चार केला. जिल्ह्यांनी कोरोना बाधितांची माहिती दररोज अद्ययावत (रिअल टाईम डेटा) स्वरूपात अपलोड करावी अशा सूचनाही टोपे यांनी यावेळी दिल्या.
पॉझेटिव्हीटीचा दर कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने मुख्य सचिव कुंटे यांनी काही सूचना केल्या तर टास्कफोर्सचे तज्ज्ञ डॉक्टर्स यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
0 टिप्पण्या