Top Post Ad

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल

ठाणे : महाराष्ट्र काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष  नाना पटोले  “एकला चलो रे'चा नारा देत  संपूर्ण महाराष्ट्रात दौरे करित आहेत. त्यांच्या या घोषणेमुळे काँग्रेसपक्षातील मरगळ दूर होण्यास मदत होत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र प्रत्येक ठिकाणी गटागटात विभागलेल्या काँग्रेसला एकत्र कसे करायचे हा मोठ्ठा प्रश्न आज महाराष्ट्र अध्यक्षांपुढे निर्माण झाला असल्याचे काही जुन्या जाणत्या नेत्यांचे म्हणणे आहे. ज्यामध्ये सर्वात मोठे उदाहरण ठाण्याचे आहे. या शहरात सुरुवातीला काँग्रेसची सत्ता होती. एकेकाळी काँग्रेसचा ठाणे शहरासह जिल्ह्यात चांगला बोलबाला होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून उफाळलेल्या गटबाजीने नव्या नेत्यांची फळी उभी राहिली नाही. त्यामुळे काँग्रेस पक्ष अक्षरशः रसातळाला गेला. आमदार, खासदारांबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेत मोठे संख्याबळ ठेवणाऱ्या काँग्रेसला आता हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच स्थानिक स्वराज्य संस्थेत लोकप्रतिनिधी आहेत. एक खासदार राज्यसभेवर आहेत ते सोडले तर जिल्ह्यात काँग्रेसचा आमदार आणि खासदार सद्य:स्थितीत एकही नाही. 

   पक्षाला पुन्हा ठाणे शहरात पूर्वीसारखं वैभव मिळावे यासाठी काँग्रेस प्रदेशाच्या वरिष्ठ पातळीवर मोठे प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये आता संपूर्ण ठाणे शहराची एकहाती सत्ता अध्यक्षांकडे सोपविण्यापेक्षा त्यांच्या जोडीला आठ शिलेदारांची फौज तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. एकावर ठाण्यातील चार विधानसभांची जबाबदारी टाकण्यापेक्षा त्या-त्या विधानसभेसाठी अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष नेमणे सोयीचे होईल, असा विचार केला जात आहे. त्यातून त्या चारही ठिकाणी वर्चस्व असलेल्या मंडळींचा कसून तपास सुरू आहे. अशा आठ जणांचा फौजेसह शहराध्यक्षावर प्रदेश कमिटीचे नियंत्रण राहणार आहे. त्यांच्यावर टाकलेल्या जबाबदारीला त्यांनी योग्य न्याय देऊन काँग्रेसला पुन्हा उभारी देण्याचे काम केले  तसेच जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून महापालिकेवर पाठवले तर अशा शिलेदाराला थेट महापालिकेत मागच्या दारातून सभागृहात पाठवण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसच्या खास सूत्रांनी दिली. या आठही शिलेदारांची नावे अद्यापही गुलदस्त्यात आहेत. या नव्या प्रयोगामुळे ठाणे शहराध्यक्षाचे महत्त्व कमी केले जाणार असल्याची चर्चा आता ठाण्यात रंगली आहे.  एकंदरीत या सर्व  प्रक्रियेवर येत्या काही दिवसांत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

दरम्यान ठाणे काँग्रेसमध्ये आतापर्यंत कोणालाही पैसे देऊन दाहर अध्यक्षपद मिळालेले नाही. निष्ठावान कार्यकर्त्यांची काँग्रेसमध्ये कदर केली जाते. त्यामुळे दीड कोटी रुपये दक्षिणा दिल्याने कुणी अध्यक्ष होईल,  अश्या वावड्यांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही, असे स्पष्टीकरण ठाणे काँग्रेस शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दिले.  आमच्या पक्षात  कोणत्याही प्रकारे पैसे देऊन शहराध्यक्षपद मिळत नाही. निष्ठावान कार्यकर्त्यांची पक्षात नेहमी कदर केली जाते. पक्षाने ज्या पद्धतीने माझ्यावर विश्वास दाखवला त्या पद्धतीने मी शहराध्यक्षपद भूषविले आहे. यापुठे देखील पक्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांना शहराध्यक्षपद मिळेल, असा विश्वास विक्रांत चव्हाण यांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com