ठाणे राज्य शासनाच्या दि. ४ जुन रोजीच्या आदेशानुसार आणि ठाणे जिल्ह्यातील मनपा निहाय आकडेवारी लक्षात घेता ठाणे आणि नवी मुंबई मनपा क्षेत्र निर्बंध स्तर दोन मध्ये असुन कल्याण डोंबिवली क्षेत्र आणि उर्वरित ठाणे जिल्हा (उल्हासनगर,मीरा भाईंदर आणि भिवंडी मनपांसह) निर्बंध स्तर तीन मध्ये मोडते आहे. शासनाने या स्तरांसाठी जाहीर केलेल्या निकषांप्रमाणे ठाणे जिल्ह्यात उद्या सोमवार दि. ७ जुन पासुन निर्बंध शिथील करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जाहीर केले आहे. ठाणे, नवीमुंबई मनपा दुसरा स्तर आणि कल्याण डोंबिवली मनपा तीसरा स्तर या क्षेत्रांतील निर्बंध शिथीलतेबाबतचे आदेश मनपा आयुक्तांमार्फत जाहीर करण्यात येतील. ते त्या शहरांसाठी बंधनकारक असतील. वरील तीन मनपा क्षेत्र वगळता उर्वरित ठाणे जिल्ह्यासाठी तिसऱ्या स्तराचे निर्बंध लागु आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी निर्बंध शिथील करण्याचे आदेश दिले आहेत.
- *अत्यावश्यक वस्तू व सेवासंबधी* व्यवसाय व दुकाने दररोज सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक वस्तू व सेवा व्यतिरिक्त इतर सर्व व्यवसाय व दुकानांना सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मुभा आहे.
- रेस्टॉरंट, हॉटेल्स, खानावळी, शिवभोजन थाळी सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 4 या वेळेत 50 टक्के आसन क्षमतेनुसार डाईन-इन सुविधा असेल. दररोज 4 वाजेनंतर व शनिवार आणि रविवार फक्त पार्सल व घरपोच सुविधा देता येईल.
- सार्वजनिक ठिकाणे क्रिडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बगीचे, मॉर्निंग व इव्हीनिंग वॉक, सायकलिंग दररोज सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत सुरू राहतील.
- खाजगी आस्थापना सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. पण खाजगी बँका, विमा, औषध कंपनी, सुक्ष्म वित्त संस्था व गैरबँकींग वित्तसंस्था यांची कार्यालये नियमीतपणे सुरु राहतील. नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करून उद्योग, व्यवसाय करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
- शासकीय/ निमशासकीय/ खाजगी- क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीसह कार्यरत राहतील. कोरोना विषयक कामे करणाऱ्या आस्थापना, कृषी, बँक, मान्सुनपुर्व कामांशी संबंधित यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधीत यंत्रणा, कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू राहतील.
- विवाह समारंभ कमाल 50 लोकांच्या उपस्थितीत करता येईल. तर अंत्यविधी कमाल 20 लोकांच्या उपस्थितीत करता येईल. क्रिडा व मनोरंजन बाहेर मोकळया जागेत सकाळी 5 ते सकाळी 9 व सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत करता येईल. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार 50 टक्के उपस्थितीत सभागृहाच्या क्षमतेच्या सायंकाळी 4 वाजेपर्यंत घेता येईल. सभा/ निवडणुका, स्थानिक प्राधिकरण व सहकारी संस्था यांचे आमसभा- क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती राहता येईल.
- जीम / सलुन / ब्युटीपार्लर / स्पा / वेलनेस सेंटर दररोज सायंकाळी 4 वाजेपर्यंत 50 टक्के ग्राहक क्षमतेसह पूर्वनियोजित वेळ ठरवून सुरू राहतील. वातानुकुलन यंत्रणाचे वापरास मनाई करण्यात आली आहे.
- जमावबंदी सायंकाळी 5 वाजेपर्यंत, तर संचारबंदी सायंकाळी 5 नंतर असेल.
- सार्वजनिक बस वाहतुक पूर्ण आसनक्षमतेने परंतु, प्रवाशांना उभे राहून प्रवास करण्यास मनाई आहे. कोविडविषयक मार्गदर्शक तत्वांचे पालन करुन आंतरजिल्हा प्रवासी वाहतुक खाजगी कार, टॅक्सी, बस नियमीतपणे पूर्णवेळ सुरू राहील. पण जर प्रवासी लेवल 5 मधील भागातून येत असेल तर ई-पास आवश्यक असेल. कृषी संबंधीत बाबी दररोज सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.
- अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे युनिट (आवश्यक वस्तू आणि कच्चे माल / पॅकेजिंगचे उत्पादन करणारे घटक म्हणून वर्गीकृत केलेल्या वस्तू व आवश्यक असलेल्या पुरवठाच्या साखळीसह)सर्व सतत प्रक्रिया सुरू असणारे उद्योग (ज्या युनिट्ससाठी अशा प्रकारच्या प्रक्रियेची आवश्यकता ज्या अशा प्रकारच्या स्वरूपाच्या असतात ज्यांना त्वरित थांबवता येत नाही आणि पुरेश्या पुन्हा सुरू होऊ शकत नाही)राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वस्तूंचे उत्पादन. अत्यावश्यक, गंभीर स्वरुपाच्या पायाभूत सेवा सुविधा देणारे डेटा सेंटर / क्लाऊड सेवा देणारे आयटी सेवा नियमित सुरू राहतील.
- उत्पादन सेक्टरमधील इतर सर्व उत्पादन युनिट, जे अत्यावश्यक सेवेत समाविष्ट केलेले नाहीत, परंतू निरंतर चालू ठेवणे आवश्यक आहेत, असे युनिट केवळ ५०% कर्मचारी क्षमतेने सुरू राहतील. या आदेशाची अंमलबजावणी ठाणे जिल्हयातील मिरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्र, अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर शहापूर, मुरबाड नगर पंचायत क्षेत्र व संपूर्ण ग्रामीण क्षेत्र या एकत्रित स्वतंत्र प्रशासकीय घटक क्षेत्रांमध्ये लागु आहेत. आहे. हे आदेश दि. १३जुन रोजी मध्यरात्री १२.०० वा. पर्यंत लागू राहतील
0 टिप्पण्या