कोरोनामुळे देशाची परिस्थिती ही नकळत वादळात तरंगणार्या बोटीप्रमाणे झाली आहे. जेव्हा देशात कोरोनाचा संसर्ग कमी होतो, तेव्हा आपले प्रधानमंत्री श्रेय घेतात आणि परिस्थिती बिघडल्यास राज्यांना दोष देतात. असे स्पष्ट मत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी शनिवारी मोदी सरकारवर कडाडून हल्लाबोल करताना व्यक्त केले. राहुल गांधी यांनी लसीच्या दरावरुन केंद्र सरकारला कटघर्यात उभे केले आहे. सरकार लसीच्या दरांवरुन विचित्र वागणूक देत असून प्रथम लसीचा दर जाहीर केला जातो, त्यानंतर दबावानंतर तो कमी केला जात आहे,
केंद्र सरकार स्वतः ही लस 150 रुपये घेत इतरांना वाढीव दरात लस देत आहे. सरकार लोकांच्या डोळ्यात धूळफेक करीत असल्याचा आरोपही गांधी यांनी केला. कोरोना संसर्गाच्या त्सुनामीसाठी केंद्र सरकार पूर्णपणे जबाबदार आहे. राहुल गांधी याच्या मते, मोदी सरकार अहंकारी असून वास्तवापासून दूर राहत केवळ समजुतींवर लक्ष असतो. प्रधानमंत्री हे केंद्र आणि वैयक्तिकृत सरकार चालवत असून ते त्यांच्या ब्रँडिंगमध्ये व्यस्त असल्याची टिका ही त्यांनी यावेळी केली.
आता समाजातल्या सर्व स्तरांमधून भाजपच्या मोदी सरकारवर टीका केली जात आहे. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनीही आता ट्विट करत उपरोधिक शैलीत टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “सर नरेंद्र मोदीजी, मी एक सभ्य हॉरर चित्रपट निर्माता आहे. पण माझी तुम्हाला विनंती आहे की मला तुमच्या आगामी “तिसरी लाट” या हॉरर चित्रपटात स्पॉट बॉयचं काम द्या. मी मृतदेह मोजण्याच्या विभागातही काम करु शकतो. कारण, तुमच्याइतकेच मलाही मृतदेह आवडतात पण कारणं वेगवेगळी आहे”.
दरम्यान देशात कोरोना महामारीचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत मोदी यांनी देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यामध्ये ऑक्सिजन आणि अत्यावश्यक औषधांचादेखील आढावा घेतला. त्यासोबतच मोदी यांनी देशातील तज्ञांसोबत वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली असून कोरोनाशी लढण्यासाठी अनेक महत्वपूर्ण पाऊले उचलली गेली आहे. सरकारी सुत्रांच्या माहितीनुसार, मोदी यांनी कोरोनाशी लढण्यासाठी मनुष्यबळ वाढवण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये वैद्यकीय आणि नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना सामील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जे विद्यार्थी वैद्यकीय आणि नर्सिंगच्या अंतिम वर्षाला असतील अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करुन सेवा देण्यासाठी तयार केले जाणार आहे.
0 टिप्पण्या