कोविड-१९ ची वाढत असलेली महामारीमुळे भारतातील प्रवासावर अनेक देशांनी बंदी घातली आहे. दुबई, सिंगापूर, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आेमान, हाँगकाँग, फ्रान्ससह अनेक देशांनी भारताच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. अमेरिका, इस्रायलने भारतातून येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सिंगापूरमध्ये १४ दिवस क्वाॅरंटाइन झाल्यानंतर सात दिवसांपर्यंत घरात अनिवार्य रूपाने राहावे लागेल. कॅनडाने भारतातील प्रवासावर ३० दिवसांसाठी बंदी आणली आहे. गुरुवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. ब्रिटनमध्ये भारतीय व्यक्तीच्या प्रवेशासाठी रेड लिस्ट नियम लागू केला जाईल. गुरुवारी ब्रिटनमध्ये इंडियन व्हेरिएंटचे ५५ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे भारतातून ब्रिटनमध्ये येण्यास मनाई करण्यात आली आहे. दिल्लीहून मायदेशी जाणारे किंवा ब्रिटन किंवा आयर्लंडचे नागरिक १० दिवस हाॅटेलमध्ये क्वाॅरंटाइन राहतील.
भारतातून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशास दुबईत प्रवेश नाही. मनाई २५ एप्रिलपासून १० दिवसापर्यंत असेल. १४ दिवस इतर देशांत काढणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना दुबईत प्रवेशाची परवानगी असेल. सिंगापूरमध्ये भारतातून जाणाऱ्या लाेकांना पहिल्यांदा १४ दिवसांसाठी विशेष व्यवस्थेत व नंतर ७ दिवस घरात विलगीकरणात राहावे लागेल. विमान प्रवास राेखणारा पहिला देश. न्यूझीलंडचे प्रवासीही ११ ते २८ एप्रिलदरम्यान परत येऊ शकत नाहीत. हाँगकाँगहून भारतातून येणारी-जाणारी विमान उड्डाणे ३ मेपर्यंत रद्द केली. या महिन्याच्या दाेन उड्डाणांदरम्यान ५० बाधित आढळले हाेते.
कोरोनाच्या भारतीय व्हेरिएंटचा फटका ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या आशिष कुमार यांना बसला आहे. आशिष, त्यांची पत्नी व दोन मुलींना शुक्रवारी विमानतळावरून परत पाठवण्यात आले. आजारी वडिलांसाठी आशिष यांना हैदराबादला यायचे होते. यासाठी त्यांनी नाेकरी तर सोडली आपले घर, गाडी, साहित्यही विकून टाकले. रात्री ९ वाजता ते चेक इनसाठी पोहोचल्यावर कर्मचाऱ्यांनी त्यांना परवानगी नाकारली. आशिष यांनी अडीच लाख रुपयात तिकिटे घेतली, मात्र नव्या नियमांमुळे ते रस्त्यावर आले. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाने गेल्या वर्षी मार्चपासून त्यांचे नागरिक व कायमच्या रहिवाशांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी घातली होती. मात्र अपवादात्मक सूट होती. दरम्यान, भारतात संसर्ग वाढल्याने ऑस्ट्रेलिया सरकारने नियम बदलला. आशिषसारख्या शेकडो भारतीयांनी आधी परवानगी घेतली, मात्र नियम बदलल्याने ती वाया गेली.
कोरोनाचा सामना करण्यासाठी भारताला मदत करण्यासाठी जाणारे किंवा ऑस्ट्रेलियाच्या देशहितासाठी भारतात जाणाऱ्यांनाच जाण्याची परवानगी दिली जाईल किंवा अशी व्यक्ती जिला ऑस्ट्रेलियात उपचार उपलब्ध होत नाहीत व उपचारासाठी भारतात जात आहे.
0 टिप्पण्या