मुंबई
चेंबूर येथील पंचशीलनगर मधील महिलां मागील अडीच वर्षांपासून बुद्धविहारासाठी बेमुदत साखळी उपोषण करत आहेत. मात्र कंगनाच्या भेटीसाठी तीच्या बंगल्यावर स्वतहून जाणाऱ्या तथाकथित आंबेडकरी नेत्यांना या महिलांचा आक्रोश दिसत नाही का असा सवाल चेंबूरमधील संतप्त आंबेडकरी जनता विचारत आहे. चेंबूर येथील येथील उपोषण मंडप तोडल्यानंतर 19 जानेवारी 2021 पासून महिलांनी आझाद मैदान येथे बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. शासन याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. इतकेच नव्हे तर स्वतला आंबेडकरी, रिपब्लिकन म्हणवून घेणारे तथाकथित बौद्ध नेतेही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
याबाबत शासन प्रशासनाला जागे करण्यासाठी आणि आपली मागणी जनसामान्यांपर्यंत पोहोचावी याकरिता सदर महिलांनी मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेतली. या परिषदेमार्फत त्यांनी बुद्धविहारबाबत आठ दिवसांत निर्णय घ्या अन्यथा आत्मदहन करू, असा इशारा दिला आहे. हे इशारापत्र त्यांनी स्वतच्या रक्ताचे ठसे मारून प्रशासनाला दिले आहे. सुमारे दोन वर्षे 38 दिवसांचे ऐतिहासिक आंदोलन केल्यानंतर सुद्धा न्याय मिळत नसेल तर या झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आता आत्मदहन करण्याशिवाय मार्ग नाही, एसआरएच्या नावाखाली तेथील बुद्धविहार घाणीत, शौचालयाच्या टाकीजवळ बांधून बुद्धविहाराचे विटंबना करत आहे. या बांधकाम व्यावसायिकांचे बड्या नेत्यांशी संबंध आहेत. राजकीय दबावामुळे तेथील बुद्धविहारासारखा अति संवेदनशील विषय आजतागायत जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आला आहे. निवडणुकीच्या वेळी आंबेडकरी जनतेची मते मिळवण्याकरिता एखाद्या भिकाऱयाप्रमाणे येणारे उमेदवार आपला हेतू साध्य झाल्यावर आंबेडकरी जनतेच्या मागण्यांना नेहमीच केराची टोपली दाखवत आले आहेत. मात्र यावेळेस बुद्धविहाराचाच प्रश्न असल्याने हा आमच्या अस्मितेचा प्रश्न झाला असल्याचे आंदोलनकर्त्यां महिलांनी सांगितले.
बुद्धविहार बांधल्यास बिल्डरचे फ्लॅट्स कोणीही विकत घेणार नाही, अशी मानसिकता असणाऱया बिल्डरला वाचविण्यासाठी याविषयाकडे सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे. रस्ता रुंदीकरणात बांधा येत असलेले मंदीर कधीही तोडल्या जात नाही इतकेच नव्हे तर त्याच ठिकाणी त्याचे निर्माण कंत्राटदार करून देतात. मात्र मुंबईत एसआरएच्या नावाखाली कित्येक बुद्धविहारे तोडण्यात आली या बुद्धविहारांना कोणी वालीच उरला नसल्याने याचा शासनाकडे कोणीच पाठपुरावा केला नाही. यामध्ये घाटकोपर, कुर्ला आणि चेंबूर ते मानखूर्द परिसरातील रेल्वे रुंदीकरणात गेलेल्या बुद्धविहारांना काहीही पर्याय दिला गेला नाही. मात्र तथाकथित नेते मंडळी याविषयी काहीच बोलत नाहीत. अशी खंत चेंबूर परिसरातील अनेक आंबेडकरी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
0 टिप्पण्या