Top Post Ad

तीन हजार ७६९ विजयी उमेदवारांसह २८० ग्रामपंचायतीवर वंचितची एक हाती सत्ता

मुंबई,
 नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राज्यात वंचित बहुजन आघाडीचे तीन हजार ७६९ उमेदवार विजयी झाले आहे तर २८० ग्रामपंचायतीवर वंचित बहुजन आघाडीने एक हाती सत्ता मिळवलेली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी हा राज्यात ग्रामपंचायतवरती विजय मिळवणारा मोठा पक्ष म्हणून पुढे आलेला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

दिल्लीत झालेल्या शाईन बाग आंदोलनाच्या धर्तीवर देशभर किसान बाग आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत भायखळा येथील खिलाफत हाऊस याठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीबाबत माहिती दिली राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तीन हजार ७६९ उमेदवार हे वंचित बहुजन आघाडीचे निवडून आले आहे तर २८० ग्रामपंचायतीवर वंचितने एक हाती सत्ता मिळवली आहे. ही सर्व माहिती आकडेवारी वंचित बहुजन आघाडीने जिल्हा, तालुकास्तरावर घेतलेल्या अधिकृत माहितीवरून पत्रकारांना देण्यात आली आहे.


 ग्रामपंचायत निवडणुकांचा लेखाजोखा

 राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायत निवडणुका मध्ये एकेकाकी शहरी तोंडवळा असलेल्या शिवसेनेने गावागावात सत्तेच्या माध्यमातून प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या विदर्भात काँग्रेसने आश्वासक यश मिळवुन 'हम भी कुछ कमी नहीं हे सिद्ध केले आहे. राष्ट्रवादी आणि भाजपने आपापल्या पट्ट्यात सरस कामगिरी केली असली तरी मनसेने पहिल्यांदा काही ठिकाणी यश मिळवून सर्वाना चकित केले आहे.  तौलनिक दृष्ट्या सर्व पक्षांच्या परफॉर्मन्स चा विचार करता शिवसेनेला मिळालेले घवघवीत यश हे बोनस मिळाल्याचे स्पष्ट होते.  .14234 ग्रामपंचायत निवडणुकी पैकी प्रत्यक्षात 12हजार 711 निवडणुकीसासाठी मतदान झाले. पण त्यामध्येही स्थानिक आघाड्या आणि पक्षीय सरमिसळ मोठ्या प्रमाणात होती. या संपूर्ण निवडणुकीत 3263 जागा मिळवून भाजप जरी एक नंबर वर दिसत असला तरी किमान 2800 जागी शिवसेनेने भगवा फडकवला आहे. आणि तो सुद्धा स्वबळावर. 

सेनेच्या यशाचा आढावा घेतला तर कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर ग्रामपंचायत निवडणुकीतील दणदणीत यशाकडे पाहावे लागेल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गावातील ही प्रतिष्ठेची लढत होती. एकीकडे भाजप , राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र असताना शिवसेनेने येथे एकहाती सत्ता आणली आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांनी यासाठी मेहनत घेतली. असाच एक चमत्कार नांदेड मध्ये काँग्रेसचे अशोक चव्हाण यांच्या गढीत शिवसेनेने केला आहे. बारड या ग्रामपंचायत मध्ये काँग्रेसची सत्ता उलथवून सेनेने एकहाती ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाडा मध्येही सेनेची कामगिरी पहिल्या पेक्षा जास्त सरस आहे. औरंगाबाद , नाशिक तसेच कोल्हापूर मधील काही भाग , या सर्व ठिकाणी शिवसेना फायद्यात राहिली आहे. मात्र कोकणात काही ठिकाणी या यशाला गालबोट लागले असले तरी अन्यत्र बाणाने अनेकांची शिकार केली आहे. आकडेवारी बोलकी आहे.

 याआधी शिवसेनेचे संपूर्ण राज्यात केवळ 451 ग्रामपंचायतीवर वर्चस्व होते. आता हा आकडा तीन हजारावर पोचला आहे. भाजपचा विचार केला तर त्यांना ना नफा ना तोटा असा अनुभव आला आहे. कारण काही ठिकाणी स्थानिक आघाडी मध्ये भाजप , राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले होते. तर अनेक ठिकाणी तेथील राजकीय नेतृत्व कारणीभूत ठरले. आपापले गड शाबूत ठेवण्यात ही मंडळी यशस्वी ठरली. जी एकेकाळी काँग्रेस अथवा राष्ट्रवादीत होते. आता हे सर्व भाजप मध्ये आहेत. पण विदर्भात मात्र भाजपला अनेक ठिकाणी धक्का बसला  आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा येथेही भाजप अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. हीच अवस्था पश्चिम महाराष्ट्र मध्येही आहे. 

खान्देशात खडसे यांनी भाजपची सद्दी संपविली आहे. तर माजी मंत्री राम शिंदे यांच्या ताब्यातील जवळपास सर्वच ग्रामपंचायती राष्ट्रवादीने ताब्यात घेतल्या आहेत. तर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या अधिपत्याखाली असलेल्या ग्रामपंचायती यावेळी निसटल्या आहेत. थोडी समाधानाची बाब म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणारी अकलूज ग्रामपंचायत विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या ताब्यात ठेवली तर कोकणात नारायण राणे यांनी वैभववाडी , कणकवली येथे आपले प्राबल्य कायम ठेवले आहे. राष्ट्रवादीच्या. सर्वच दिगग्ज नेत्यांनी आपल्या ताब्यातील ग्रामपंचायती कायम ठेवल्या आहेत. अपवाद केवळ मिरज तालुक्यातील म्हेशाळ ही ग्रामपंचायत माजी आमदार मोहनराव शिंदे गटाने गमावली. शिंदे हे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे मेहुणे आहेत. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र , मराठवाडा आणि खान्देश मध्ये राष्ट्रवादीची उत्तम कामगिरी आहे. राष्ट्रवादी ने 2999 ग्रामपंचायती मध्ये सत्ता स्थापनेत यश मिळविले आहे.

विशेष म्हणजे एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्याने अडचणीत आलेले सामाजिक कार्य खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी तालुक्यातील 13 पैकी 11 ग्रामपंचायती ताब्यात ठेवल्या आहेत. त्यामुळे परळीवासीयांनी मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांना महत्व दिले नाही. काँग्रेसचा आलेख सुद्धा समाधानकारक आहे. मराठवाडा , उत्तर महाराष्ट्र आणि खान्देशात चांगली कामगिरी करतानाच भाजपच्या विदर्भातील अभेद्य गडाला पाडण्याचे काम काँग्रेसने केले आहे. मरगळ आलेल्या या पक्षाला या निमित्ताने सजीवनी मिळाली आहे. अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज या दोन माजी मुख्यमंत्र्यांचा अपवाद वगळता सर्व नेत्यांनी आपले किल्ले शाबूत ठेवले आहेत. कराड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना मात देत भाजपच्या अतुल भोसले यांनी सत्ता मिळविली आहे. राज्यात काँग्रेसने 2151 ग्रामपंचायत आपल्या ताब्यात आणल्या आहेत. बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार , सतेज पाटील या सर्वच नेत्यांनी पक्षाचे अस्तित्व कायम ठेवले आहे.

दखल घेण्याजोगी बाब म्हणजे राज ठाकरे यांच्या मनसे ने 38 ग्रामपंचायती मध्ये सत्ता हस्तगत केली आहे.. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील ग्रामपंचायत तसेच काही पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. हिवरे बाजार हे आदर्श गाव पोपटराव पवार यांनी आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले असून राळेगणसिद्धी येथे आण्णा हजारे यांना मानणाऱ्या गटाने वर्चस्व कायम ठेवले आहे. पण पेरे या औरंगाबाद येथील आदर्श गावात पेरे पाटील यांची सत्ता संपुष्टात आली आहे. हे गाव आदर्श करण्यात पेरे पाटील यांचा मोठा वाटा होता. या निवडणुकीचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे तृतीयपंथी उमेदवार अंजली पाटील यांचा विजय. ग्रामपंचायत मध्ये राज्यात पहिल्यांदा सदस्य म्हणून तृतीयपंथी काम करणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील वाभोल ग्रामपंचायतीत अंजली पाटील सदस्य म्हणून या पुढे काम करतील. सर्वच पक्षांनी या निवडणुकीत आपणच सरस असा दावा केला असला तरी यावेळी मात्र भाजप, राष्ट्रवादी, कॉंग्रेस या पक्षांच्या तुलनेत शिवसेनेला राज्याच्या ग्रामीण भागात मिळालेले यश हे बोनस म्हणून समजले पाहिजे. महाविकास आघाडी चा विचार केला तर या तिन्ही पक्षांना या निवडणुकीचा चांगलाच फायदा झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com