नवी दिल्ली,
: भारताच्या ड्रग्ज रेग्युलेटर ड्रग्ज स्टँडर्स कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या तज्ज्ञ समितीनं गेल्या आठवड्यात भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या कोरोना लशीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी दिली. मात्र या लशीच्या प्रभावाबाबत खात्री नसल्याचंही दाखवून दिलं होतं. पण आता लशीला मंजुरी दिल्यानंतर काही तासांतच समितीनं पुन्हा आपलं मत मांडलं आहे आणि यामुळे आता लशीच्या प्रभावाबाबत आणखी प्रश्नचिन्हं उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतात आपात्कालीन मंजुरी देण्यात आलेल्या स्वदेशी कोरोना लशीवर अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आले. भारत बायोटेकनं तयार केलेल्या कोवॅक्सिनबाबत शंका व्यक्त केल्या जाऊ लागल्या. अगदी भारत बायोटेक आणि कोव्हिशिल्ड लस तयार करणारी पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट दोन्ही कंपनी आपासात भिडल्या होत्या. पण त्यानंतर दोघांनीही एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आणि आता कोवॅक्सिनला मंजुरी देणाऱ्या तज्ज्ञांच्या समितीनंही लशीच्या सुरक्षिततेबाबत यू-टर्न घेतला आहे.
रिपोर्टनुसार, 1 जानेवारीला जेव्हा लशीचं सादरीकरण झालं तेव्हा यामध्ये लशीनं मजबूत अशी रोगप्रतिकार प्रक्रिया दिली असली तरी भारत बायोटेकनं पुरवलेला डेटा पुरेसा नसल्याचं म्हटलं होतं. द इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार याची प्रभावशीलता अद्याप सिद्ध होणं बाकी आहे, असं समितीनं म्हटलं होतं आणि भारत बायोटेकला तिसऱ्या टप्प्यात अधिकाधिक लोकांना सहभागी करून घेण्यास सांगितलं होतं. पण 2 जानेवारीला मात्र समितीच्या या सर्व शंका दूर झाल्या. त्या दिवशी समितीनं सांगितलं की, कंपनीनं प्राण्यांवर केलेल्या प्रयोगाचा अहवाल सादर केला ज्यामध्ये लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. दरम्यान समितीनं अचानक बदललेल्या या निर्णयावर तज्ज्ञांनी प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहेत. ऑल इंडिया ड्रग अॅक्शन नेटवर्कच्या मालिनी ऐसोला डेक्कन हर्लडशी बोलताना म्हणाल्या, पहिल्या दोन बैठकींपासून ते तिसर्या दिवसापर्यंत समितीच्या निर्णयात अचानक बदल झाल्यामुळे आम्ही हैराण झालो आहोत. परवानगीसाठी लस प्रभावी असल्याचा डेटा गरजेचा आहे, अशी अट असताना त्यातच सूट देण्यात आली आहे.
0 टिप्पण्या