आपण जाब केव्हा विचारणार आहोत
बेकायदा शस्त्र साठा करून,त्याचे जाहीर प्रदर्शन दाखवून परिवर्तन वादी कार्यकर्त्यांना असुर ठरवून त्यांना ठार करण्याचा निर्धार आरएसएस ने केला आहे.त्या विरूद्ध मी दिलेली तक्रार नोंदवून घेण्यास नागपूर पोलिसांनी नकार दिल्यावर पूर्व सूचना देवून मी पो. महासंचालक सुबोध जयस्वाल यांना 23 ऑक्टो.रोजी भेटायला गेलो. त्यांनी भेटण्यास नकार दिला. सुहास वारके या हुद्द्याने तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अधिकाऱ्यास भेट घेण्यास सांगितले. गुन्हा दाखल करण्यास वारकेनी ही नकार दिला. 2008 मालेगाव बॉम्ब स्फोटात चुकीचे आरोपी अटक केले होते पण नंतर एन आय ए ने तपास करून आरएसएसशी संबंधित आरोपी पकडले होते.आरोपींना मदत व्हावी याच हेतूने सुहास वारके एन आय ए चे प्रतिनिधी म्हणून केस मधील सरकारी वकील सलियान यांना भेटले व वरिष्ठ पातळीवरून आलेला आदेश त्यांना दिला."Go slow हळू चला"
आरएसएस ची बाजू घेवून तिच्या रक्षणासाठी पुढे सरसावलेले हे सुहास वारके कोण आहेत? आरएसएसच्या वर्ण व्यवस्थेच्या उतरंडीत त्यांचे स्थान काय?
ते जळगाव जिल्ह्यातील एका छोट्या गावचे रहिवाशी. वडील पेशाने शेतकरी व मध्यम व्यावसायिक असल्याचे समजते.
एमबीबीएस झाल्यावर पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून आयपीएस झाले. ओबीसी मधून मिळालेले आरक्षण त्यांना राज्य घटने नुसार मिळाले. आरएसएस विचार धारे नुसार नाही. मग वारके व मंडळी आरएसएस ची तळी का उचलतात? त्यांना पूरक असे वर्तन का करतात याचा विचार झाला पाहिजे. मी नागपूर कोतवाली पोलीस स्टेशनला दिलेली तक्रार दखलपात्र गुन्ह्याची आहे व ती दाखल करून घेण्याशिवाय पर्याय नाही असे असता वारके गुन्हा दाखल करून घेणे ऐवजी मला कोर्टात जाण्याची सूचना का करतात?आरएसएस विचारधारे नुसार लेवा पाटील जातीचे वारके हे तमो गुणी, भूत पिशाच्च योनीतील तसेच शूद्र वर्णीय ठरतात. वारके आता प्रशासनात शूद्र आहेत का? नाही! कारण?
फ्रेड रीग्ज यांनी भारतासह अनेक प्रगतशील देशातील नोकरशाहीचा अभ्यास करून आपले निष्कर्ष "देि प्रिझमाटीक सोसायटी ....." या ग्रंथाद्वारे प्रकाशित केलेत. इथली नोकरशाही व वारके, जयस्वाल या अधिकाऱ्यांच्या वर्तनाचे गुपित त्यातून समजते. प्रगतिशील देशातील नोकरशाही ही त्या देशातील सामाजिक व्यवस्थेची उपव्यवस्था असते. भारतात ती वर्ण व्यवस्थेवर आधारित आहे. सनातनी ब्राह्मणी वर्णव्यवस्थेनुसार वारके या जन्मात शूद्रच राहतील.फळाची आशा न धरता या जन्मात शुद्राची कर्तव्ये पार केली तर त्यांना पुढील जन्म वरच्या वर्णातील म्हणजे क्षत्रियाचा मिळेल. ब्राह्मणाचा नव्हे. यालाच सनातनी ब्राह्मणी धर्माची बंद मजल्यांची इमारत म्हणतात. पण नोकर शाहीचि वर्ण व्यवस्था वेगळी आहे. इथ घटनात्मक मार्गाने सुपर क्लास वन अधिकारी बनलेले,पण सामाजिक दृष्ट्या शूद्र असलेले वारके हे प्रशासनातील एकदम सत्व गुणी उच्च वर्णीय ब्राह्मण बनतात.ते इतरांना तुच्छ मानायला व त्यांचे शोषण करायला लागतात.
ते माझ्यासह इतरांची तक्रार का घेत नाहीत? घेतली तर नेमक्याच तक्रारी का घेतात? ब्राह्मण वर्णीयांना जशी धार्मिक सत्ता असते तशीच या नोकरशहांना कायदेशीर/प्रशासकिय सत्ता मिळते. धार्मिक सत्ता असलेले ब्राह्मण क्षत्रियांना 'गो ब्राह्मण प्रती पालक' असा किताब देवून गोमुत्र,शेन ,दूध तसेच आपल्या संरक्षणाची सोय करून घेतात. वैश्याना व्यापार करायला सांगून गरजेच्या वस्तू मिळवतात. शूद्रांना आपले वाडे व पायखणे साफ करण्यासाठी व इतर सर्व सेवा करून घेणे साठी वापरतात.वरिष्ठ नोकर शहांचे तसेच आहे. या सत्तेचा वापर आणखी सत्ता मिळविणे,आहे ती टिकविणे व ती स्वतःचा व्यक्तिगत फायदा करण्या मध्ये जास्तीजास्त वापरणे असे सुरू होते. त्यातून नोकर शहांचा असा एक स्वार्थी अजेंडा बनतो. स्वतःचे करियर म्हणून प्रमोशन मिळविणे, प्लंपं/फायद्याचा पोस्टिंग मिळविणे. मोठ्या शहरात सरकारी कोट्यातून फ्लॅट अगर प्लॉट मिळविणे,परदेशात प्रतिनियुक्ती मिळविणे, फक्त स्वतःच्या कुटुंबाचा विचार करत मस्तीत जगणे. हे तेंव्हाच शक्य होते जेंव्हा ते आहे ती व्यवस्था कायम राखत व सत्तेत असलेल्या राजकारण्यांची हंजी हानजी करीत नोकरी करतात तेंव्हा.हे मिळविण्या साठी त्यांना आहे ही व्यवस्था कायम राखावी लागते व सत्तेवर असलेल्या राजकारण्यांची हुजरे गिरी करावी लागते.
पोलिस प्रशासनाच्या जहाजाचे सुकानू महा संचालकांच्या हातात असते हे सामान्य जनतेला माहीत नसते. पोलिस महासंचालकांना ज्यांची हूजरे गीरी करायची त्या दिशेला तो संपूर्ण दल घेवून जाण्याचा प्रयत्न करतो. केंद्रात सत्तेवर असलेल्या पक्षाकडून सुबोध जयस्वाल ला बरेच कांहीं मिळवायचेय असे बोलले जाते म्हणून तो वारकेला पुढे करून आपला अजेंडा रेटतोय. वारकेची कदाचित गुन्हा दाखल करण्याची इच्छा असेलही तसेच गुन्हा दाखल केला नाही तर आपण अडचणीत येवू शकतो हे माहितही असावे. वारकेनची अवस्था नागपूर कोतवाली पोलिस स्टेशनच्या इन्स्पेक्टर प्रमाणे इकडे आड तिकडे विहीर असी असू शकते पण तो जयस्वालला डावलू शकणार नाही कारण त्याचे करियर ठरविण्याच्या कामगिरीचा गुप्त अहवाल लिहिण्याचे अधिकार जयस्वालचे हातात आहेत. गृहमंत्री, कोर्ट या नंतरच्या गोष्टी आहेत.
जयस्वाल त्याचे घटनात्मक काम का करत नाही? पोलिस मोटार वाहन विभागात अनेक आलिशान वाहने त्यांच्या साठी राखीव आहेत.तीन लाखापर्यंत पगार,सरकारी घर,मोफत वैद्यकीय सेवा,लाखो कर्मचारी व अधिकारी सलुट करण्यासाठी दिमतीला, ...... ! या सगळ्या गोष्टी देण्यासाठी पैसा कुठून येतो? त्या सामान्य माणसांकडून जमा केलेल्या जीएसटी ,टॅक्स मधून पुरवल्या जातात! तमाम बहुजन समाजा च्या दृष्टीने महत्त्वाची अशी माझी दखल पात्र गुन्ह्याची तक्रार घेण्याचे तो उघडपणे नाकारतो.त्याला माहित आहे की त्याबद्दल त्याला कोणी प्रश्न विचारत नाही व विचारायची हिम्मत करणार नाही!
खरेतर त्यांच्यावर दबाव, अंकुश त्यांना पोसणाऱ्या जनतेने ठेवला पाहिजे. चार भारतीयांचा तगादा या कार्यक्रमा द्वारे या वरिष्ठ नोकरशहाना आपण जाब विचारणार आहोत!
आणि सामान्य जनतेची तीच इच्छा आहे !
-- सुरेश खोपडे
0 टिप्पण्या