Top Post Ad

वाढीव वीजबीलसंदर्भात मंत्रीमंडळाची बैठक, मनसेचे अनोखे आंदोलन

वाढीव वीजबीलसंदर्भात मंत्रीमंडळाची बैठक, मनसेचे अनोखे आंदोलन


ठाणे


दिल्ली सरकारने ज्या पद्धतीने वीजबिल माफी दिलेली आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातही वीज बिल माफी देण्यात यावी, अशी मागणी करीत प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात आंदोलन केले. ठाणे जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे संपूर्ण विजबिल माफीची मागणी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जनतेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता दिल्ली सरकारच्या निर्णयाला अनुसरुन घरगुती वीज बिल माफ करण्याचे मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. लोकमान्य नगर भागात ठेकेदाराकडून रिडींग नोंदविण्यासाठी माणसे पाठविण्यात येतात. मात्र, रिडींग शून्य दाखवून सलग ६-६ महिने बिले पाठविली जात नाहीत. त्यानंतर अचानक मोठ्या रकमेची बिले पाठविली जातात. या संदर्भात विचारणा केल्यास अधिकार्‍यांकडून ठेकेदाराचीच बाजू घेण्यात येत असते. तसेच, लॉकडाऊनच्या काळात राज्यभर अव्वाच्या सव्वा वीजबिले पाठविण्यात आलेली आहेत.  दिल्ली प्रमाणेच महाराष्ट्रातही वीजबिले माफ करावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली



तसेच वाढीव वीज बिलाचा निषेध करीत ठाण्यात लोकमान्य नगर येथील महावितरण कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली. आंदोलकांनी महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारालाच टाळे ठोकून गेट बाहेर महावितरण विरोधात घोषणाबाजी  केली. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनता ४ महिन्यांपासून घराबाहेर पडू शकली नाही. तर बेरोजगारीमुळे अनेकांवर आर्थिक संकट ओढावले आहे. या संकटकाळातच विज वितरण महामंडळाने सर्वसामान्य विज ग्राहकांचे विज मिटर रिडींग न घेता सरासरी विज देयक पाठवून दिली. वहन आकार आणि प्रत्येक युनिट मागे आकार वाढविण्यात आल्यामुळे ही वाढीव बिले आली असून हे आकार त्वरित रद्द करण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.


त्याचप्रमाणे नवी मुंबईतही याविरोधात नागरिकांनी वीजमंडळाच्या कार्यालयावर निदर्शने केली. कोरोना काळात टाळेबंदीत महावीतरण कडून नागरिकांना सरासरी वीज देयक देऊन नागरीकांचे कंबरडे मोडले असताना आता पून्हा वाढीव बिलाचा शॉक दिल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असुन याचा जाब विचारन्यासाठी कोपरखैरणेतील महावितरण कार्यालयासमोर सोमवारी निदर्शने केली. टाळेबंदीत काम धंधा नसताना  अवाजवी वाढीव विजबिल आल्याने नागरिक हवालदिल झालेत. याबाबत संतप्त नागरिकांनी आवाज उठवून देखील महावितरणकडून केराची टोपली दाखवत पुन्हा एकदा वाढीव वीजबिले नागरिकांच्या माथी मारून शॉक दिला आहे. याचा जाब विचारन्यासाठी कोपरखैरणेतील नागरीकांनी सोमवार २७ जुलै रोजी वीजमंडळाच्या कार्याल्यावर जाऊन निदर्शने केली.यावेळी संभदित विभागवार अभियंता जागेवर उपस्थित नसल्याने त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांनी नागरीकांना आलेल्या वीज बिलांचे ग्राहक क्रमांक घेऊन बोळवन केली.


 वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून ग्राहकांना अवाजवी वीज बिले पाठवण्यात आल्याच्या तक्रारींची दखल घेत मा. उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या उपस्थितीत एका बैठकीचे आयोजन आज करण्यात. या बैठकीत वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून ग्राहकांना पाठवण्यात आलेल्या बिलांसाठी कोणते निकष कंपन्यांच्या वतीने लावण्यात येत आहेत, याची तपासणी करण्यात आली. कोरोना संकटकाळात अनेक ग्राहकांना आर्थिक संकटालादेखील तोंड द्यावे लागत असल्याने ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत न करण्याचे तसेच स्लॅबनुसार बील आकारण्याचे निर्देश वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना देण्यात आले असल्याचे ऊर्जामंत्री ना. नितिन राऊत यांनी स्पष्ट केले. नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री ना. जितेंद्र आव्हाड, अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक, शिक्षण मंत्री सौ. वर्षा गायकवाड, परिवहन मंत्री ना. अनिल परब तसेच वीज पुरवठा करणाऱ्या सर्व कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


मनसेचे "मेल" आंदोलन


दरम्यान, ज्या नागरिकांना वाढीव बिल आले आहेत अशा  नागरिकांनी avinashjadhavmns@gmail.com या मेल आयडिवर वीज बिल पाठवायचे आहे. ज्यांना मेल करणे शक्य नाही त्यांनी मनसेचे विष्णू नगर येथे असणाऱ्या मध्यवर्ती कार्यालयात बिलाची झेरॉक्स प्रत जमा करण्याचे आवाहन मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव,  मनसे नेते अभिजित पानसे यांनी केले आहे.  वाढीव वीज बिलाच्या प्रश्नावरून मनसे आक्रमक झाली आहे. कोरोनामुळे रस्त्यावर उतरून आंदोलन करणे सुरक्षिततेच्या दृष्टीने हिताचे ठरणार नसल्याने मनसे ठाणे शहरात आगळेवेगळे जन आंदोलन करणार आहे.  या संदर्भात २८ जुलै रोजी मध्यवर्ती कार्यालयातून त्यांनी जनआंदोलनाची माहिती दिली आणि या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन देखील केले.  


कोरोनाच्या महामारीत नागरिकांचे नोकरी व्यवसायावर गदा आलेली असताना सरकारने वाढीव बिल आकारणी करून जनतेची चेष्टा सुरू केली आहे. ही बिले  माफ करावी यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी महावितरण कार्यालयात धडक भेटी देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारले. मात्र कोणत्याही प्रकारची समाधान कारण उत्तर मिळाले नाही.  सध्याची राज्याची आणि विशेषतः ठाण्याची कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन नेहमीच्या आक्रमक पद्धतीने खळखट्याक आंदोलन न करता मनसेने जनतेच्या माध्यमातून 'मेल' आंदोलन छेडले आहे. या आंदोलनात नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असे मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आवाहन केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com